मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट असे दोन गट पक्षनाव आणि चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपला दावा स्थापन करत आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. यासंदर्भात लेखी भूमिका मांडण्याचे निर्देश देऊन आयोगाने ३० जानेवारी रोजी पुढची तारीख दिली आहे. राज्यात हा सगळा प्रकार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या ट्वीटमध्ये राज्यात राजकीय उलथा-पालथ होण्याचे संकेत दिले गेले आहेत. यात त्यांनी, “सरकारचं कऊंटडाऊन सुरू. शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की”, असे सूचक ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे. हे ट्वीट आता चर्चेत आलं असून त्यावरून चर्चांना उधाण आले आहे.
सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 21, 2023
शिंदे गटाचे आमदार जर न्यायालयात अपात्र ठरले, तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, अशी शक्यता विरोधी पक्षांकडून सातत्याने वर्तवली जात आहे. त्यात विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सरकार कोसळण्याचे दावेही केले जात आहेत. निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? यावर पुढील सगळी राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.