आता इंझमामनेही तोडले अकलेचे तारे
नवी दिल्ली – शोएब अख्तर, रमीज राजा, शाहिद आफ्रिदी यांच्या पाठोपाठ आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यानेही भारतीय क्रिकेटपटूंच्या निष्ठेवर शंका व्यक्त करताना हे खेळाडू केवळ स्वतःसाठी खेळतात असे अकलेचे तारे तोडले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये अत्यंत शांत, सुस्वभावी खेळाडू अशी प्रतिमा असलेल्या इंझमामने केलेले वक्तव्य धक्कादायक असून आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे डोके फिरले असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तान व भारत यांच्यात जितके सामने झाले त्यात आमचे खेळाडू संघासाठी खेळायचे. त्यांनी 30 किवा 40 धावांची जरी खेळी केली तरीही ती संघासाठी फायद्याची ठरत होती. मात्र, भारतीय फलंदाज केवळ वैयक्तिक विक्रमासाठी, शतकासाठी खेळायचे. भारतीय सघाची फलंदाजी आमच्यापेक्षा सरस व बलाढ्य होती. तरी जर सामन्यांचा धावफलक पाहिला तर लक्षात येते की भारतीय फलंदाज केवळ वैयक्तिक कामगिरीबाबतच गंभीर असायचे, असा जावइशोध इंझमामने लावला आहे.
माझ्या कारकीर्दीत जीतके सामने झाले त्यात नेहमीच भारतीय खेळाडू संघासाठी धावा करत असल्याचे कधीच जाणवले नाही. त्यांना केवळ त्यांच्या शतकी खेळीचे किंवा विक्रमाचेच औत्सुक्य वाटायचे, असेही त्याने म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटपटूंकडून दुर्लक्ष
इंझमामने व्यक्त केलेल्या मतावर त्या काळातील तसेच सध्याच्या भारतीय संघातील खळाडूंनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आचरट मतप्रदर्शनाकडे त्यांनी दुर्लक्ष करुन इंझमामला न बोलताही चांगलीच चपराक लगावली आहे.