खालापूर, (वार्ताहर) – अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला झोडपून काढले आहे. येत्या काही दिवसामध्ये पावसालाही सुरूवात होणार आहे. त्यासाठी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीसाठी शेतकर्याकडून चौक परीसरात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकर्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचा दिसून आले होते. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. साठवून ठेवलेला जनावरांच चाराही वाहून गेला होता. त्यामळे शेतकर्यांसमोर संकट निर्माण झाले होते.
अतिवृष्टीमुळे शेतीसाठी खरेदी केलेली बी-बियाणे, औषधे, खते, वाया गेली. हाताशी येणारी पिके वाहून गेली, झालेला एवढा मोठा खर्च वाया गेला. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.
खरीप हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे. काही दिवसातच या पावसाला सुरूवात होणार आहे. या हंगामाच्या पिकाच्या तयारीसाठी शेताची नांगरट, कोळपणी, बांधावरील गवत पेटवणे, शेणखत शेतात पसरवणे, जमिन भुसभुशीत करणे, या अशी विविध कामे सुरू आहेत. तर पावसाच्या तोंडावर चौक परिसरात शेतकर्यांच्या शेतीची मशागत करण्यामध्ये वेग वाढला आहे.