कामशेत, {चेतन वाघमारे} – ग्रामीण भागात पावसाळी शेती हा अर्थार्जनाचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे भात, भुईमूग, पावटा, घेवडा/वाल सयाबीन, तूर ही पिके घेण्यात येतात. शेतीमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून शेती करत आहेत; परंतु खताच्या दरवाढीने येथील बळीराजावर संकट उभे ठाकले आहे. शेती उत्पन्नावर अंकुश लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील वर्षी तालुक्यात १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली. यंदा या क्षेत्रात वाढ होऊन सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित आहे. अवकाळी पावसानंतर नांगरणी, कुळवणी आदी शेतीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली असून बी बियाणे,खते,औषधे यांची जमवाजमव सुरू केली आहे.
मात्र ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळली असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रत्येक गोणीमागे दोनशे किंवा त्याहून अधिक दरवाढ झाली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात खतांचे दर वाढूनही राजकीय नेत्यांनी याविरोधात आपले तोंड उघडले नाही. गेल्या कृषी वर्षात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. त्यात पुन्हा खत दरवाढीची कुऱ्हाड कोसळली असल्याने शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही गळून पडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रासायनिक खतांच्या प्रति ५० किलो बोरीवर ११० ते २००, २६० रुपयांची वाढ झाली.
शेतमालाला योग्य भाव मिळावा !
खतांशिवाय उत्पादन होणे अशक्य असल्यामुळे कितीही महाग झाले, तरी ते विकत घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो. म्हणून खतांच्या किमती आवाक्यात असाव्यात अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते; मात्र दरवर्षी टप्याटप्प्याने खतांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे. त्यातच वाढलेली शेतमजुरी आणि महागडी कीटकनाशके अधिक भर घालत आहेत. खतांच्या वाढत्या किमती कमी करून शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
खते, बियाणे खरेदी करताना या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये. भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही.
तसेच खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे.बॅग वरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. – दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी
यंदाचे लागवडीखालील खरीप पिकांचे क्षेत्र अनुक्रमे –
पिकाचे नाव. – खरीप २०२४ करिता प्रस्तावित क्षेत्र –
भात १३ हजार हेक्टर
भुईमूग १०० हेक्टर
पावटा ८० हेक्टर
घेवडा/वाल ५० हेक्टर
सोयाबीन ५२५ हेक्टर
तूर बांधावर १२० हेक्टर