पवनानगर, (वार्ताहर) – संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे पिकांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्याचा फुलाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे; मात्र तरीही यंदा निवडणूक व लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी होती.
कार्यालयांचे उद्घाटन, नेत्यांचे स्वागत, सभा, आणि नेत्यांच्या स्वागतासाठी फुलांची मागणी वाढली होती. या वाढत्या मागणीमुळे फुलांच्या दरातदेखील वाढ झाली होती. मात्र आता निवडणुका संपताच आणि यात्रांचा हंगाम कमी होताच फूल बाजार कोमजला आहे. फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने फूल उत्पादक हवालदिल झाले आहेत.
प्रत्येक कार्यक्रमाला जाताना बुके किंवा फुलांचा हार घेऊन जाण्याची प्रथा काही नवीन नाही. त्यामुळे दररोज हजारो किलो फुलांची गरज भासते. मावळ तालुका हा फूल उत्पादक म्हणून ओळखला जातो. तालुक्यातून व्हॅलेंटाइन डेला परदेशात फुलांची निर्यात होते. मात्र यंदा मावळमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने तालुक्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने फुलांचे उत्पादनी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
परिणामी, फुलांच्या दरात वाढ झाली होती. निवडणुकीपूर्वी गुलाब १०० ते १५० रुपये किलो होता. निवडणूक काळात तो २०० रुपये किलो झाला होता. निवडणुकीपूर्वी सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध २५० ते ३०० रुपये किलोंवर गेला होता. निवडणूक व यात्रांच्या काळात फुलांचे दर वाढल्याने बुके आणि हारांचे दरही वाढले होते.
निवडणूक काळात बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना पुढारी व कार्यकर्त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत होती. तसेच मोठमोठ्या हारांसाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यावेळी झेंडूचेही दर वाढले होते.
राज्यात प्रचाराचा जोर जसा वाढत होता तसा फुलांचा दरही वाढत होता. प्रचारासाठी नेत्यांचे दौरे, रॅली आणि लहान-मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येत होते. तसेच विविध पक्षांची कार्यालये, शाखा, चौक सभा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यंदा फुलांसोबतच चॉकलेट बुकेला ही पसंती होती.
यामुळे वाढले होते फुलांचे दर
उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते. मात्र, बाजारात फुलांची आवक जेमतेम होती. त्यामुळे फुलांचे दर वाढले होते. त्यामुळे हार आणि बुके यांचे दरही काही प्रमाणात वाढले होते. मात्र निवडणूक होताच पुन्हा फुलांचे भाव गडगडले आहेत.