ठिकठिकाणी लांबवर रांगा : सुरक्षा साधनेही नाहीत, प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे – लॉकडाउन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवू नये, म्हणून रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, रेशन दुकानदारांकडे असणारा अपुरा साठा आणि वेळेच्या मर्यादेमुळे हे धान्य घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या रांगा दिसत आहेत.
केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशनकार्ड धारकांना गहू आणि तांदुळ उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी रेशन दुकानदारांमार्फत त्यांचे वाटपही सध्या सुरू आहे. पण, याध्ये अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यापासून रेशन दुकाने फक्त सकाळच्यावेळातच उघडी ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे फक्त सकाळी 7 ते 11 यावेळेतच धान्य वाटप होत आहे. परिणामी, नागरिकांची गर्दी होत आहे.
कर्वेनगर येथील एका रेशन दुकानासमोर दररोजी अशीच स्थिती असते. तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याचे दिसून येते. या रांगेचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा कर्मचारीदेखील नसतात. अशीच स्थिती ताडिवाला रोड आणि सिंहगड रस्त्यावरील रेशन दुकानांसमोर असते.
काही दुकानदारांकडून फक्त गहू किंवा तांदुळ यापैकी एकच धान्य देण्यात येत आहे. याबाबत काही दुकानदारांशी चर्चा केली असता, “आमच्याकडे धान्यांचा साठा करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आम्ही फक्त एकच धान्य देत आहोत’ असे सांगण्यात आले. राज्यात लॉकडाउनचा काळ आणखी वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात रेशनवरील धान्य घेण्यासाठी गर्दी आणखी वाढणार आहे. त्यामुळे नियोजन करण्याची गरज आहे.
तर, केशरी रेशनकार्ड धारकांनाही धान्य देण्याचे आदेश दिले असताना, त्यांना धान्य देण्यात येत नाही. “तुमच्या कोट्याचे धान्य आमच्याकडे आले नाही,’ असे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
खडकी परिसरात सुरक्षेची पुरेपूर काळजी
शहरात धान्य वितरणात ढिसाळपणा सुरू असताना, खडकी बोर्डाने मात्र धान्य वितरण करण्याची आदर्श पद्धत राबवली आहे. येथे रेशन धान्याचे वाटप हे एक मैदानात करण्यात येत आहे. त्यामुळे आपोआपच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. त्याचबरोबर धान्य घेण्यासाठी जाताना प्रथम हाताला सॅनिटायझर लावले जात आहे. धान्याचे वितरण करणाऱ्या दुकानदारांना ग्लोव्हज देण्यात आले आहेत. शहरात सुद्धा अशाच प्रकारे धान्याचे वितरण केल्यास नक्कीच करोनाचा धोका टळू शकेल.