औरंगाबाद : औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या यांच्या सभा पार पडणार आहेत. मात्र याचवेळी श्रीकांत शिंदेंच्या सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे. ज्यात सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी नमस्कार करतानाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यांच्या या पोस्टर मुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र याचवेळी सभेच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मंडपाच्या पडद्यांवर आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र लावण्यात आला आहे. ज्यातून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना सत्ता असताना आणि सत्ता नसताना असे चित्र या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्रात सत्ता असताना सत्तेच्या खुर्चीवर झोपलेले आदित्य ठाकरे आणि सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधणारे आदित्य ठाकरे दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, खरे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सभा रद्द केल्याचे मला कळाले होते. त्यांची सभा रद्द झाल्याने किमान त्यांचे व्यंगचित्र तरी आमच्या सभेत लोकांना पाहायला मिळाला पाहिजे. सत्तेत असताना कशाप्रकारे झोपले होते आणि सत्ता जाताच आता शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहे. विशेष म्हणजे पाऊस गेला, सोगणी झाली असून, शेतात आता पिकांचे धसकट उरली आहे. त्यामुळे शेतं खाली झाल्यावर आणि कापसाच्या पिकांचे नकट्या राहिल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर येत असतील तर धन्य आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. तर विरोधकांची आता एक कार्यशाळा घेण्याची गरज असून, विरोध कधी करायचा याबाबत तरी त्यांना यातून कळेल असेही सत्तार म्हणाले.
तसेच ज्यावेळी आदित्य ठाकरे सत्तेत होते त्यावेळी त्यांना कळले नाही कधी आणि कुठे जावेत. त्यामुळे पप्पू टू म्हणण्याचा अर्थच हे आहे की, त्यांनी व्यंगचित्रमध्ये दिसत असल्यासारखी परिस्थिती केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नक्कीच जावे, मात्र शेतात काहीच नसल्यावर जाऊन काय फायदा होणार आहे. त्यांना आता माहित आहे की, सर्व पंचनामे झाले असून, 24 लाख हेक्टरचे पैसे देण्याची कबुली तत्त्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईचं श्रेय घेण्यासाठी त्यांना जाग आली असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहे.