Thane Lok Sabha Constituency – ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांचे समर्थक माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत निषेध केल्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच हातघाईवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळावा यासाठी भाजप शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होता. शिवाय भाजपकडून माजी खासदार डॉ. संजीव नाईक दुसर्यांदा या मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी महापौर आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप पदाधिकारी नाराज झाले आहेत.
नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने गणेश नाईक यांच्या क्रिस्टल हाऊसमध्ये सकाळपासूनच नाराजीचा सूर आळवत बैठकांचा सपाटा सुरू झाला. नरेश म्हस्के यांना नवी मुंबईतून सहकार्य न करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली. एवढेच नव्हे तर डॉ. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, मंडल, बूथ संघटक आणि वॉरियर्सने पदांचे राजीनामे दिले आहेत. गणेश नाईकांनी शिवसेनेविरोधात संघर्षाची वात पेटवल्यामुळे एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा उद्या शुक्रवारी (३ मे) अंतिम दिवस आहे. अशातच आमदार गणेश नाईकांनी उघडपणे नाराजीला वाट करून दिल्यामुळे त्यांची समजूत काढण्यास फडणवीस-शिंदे यशस्वी होतील का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.