संगमनेर -हॉटस्पॉट कालावधी संपल्यानंतर देखील पुढील आठवडाभर शहरातील दुकाने बंदच ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर संगमनेर व्यापारी असोसिएशनने व्यापाऱ्यांशी चर्चा करून 24 मे ऐवजी 26 मे रोजी आपले व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश जाजू यांनी दिली. त्यामुळे शहरात 24 ते 26 मे पर्यंत सर्व दुकाने, अस्थापन बंद राहतील.
मोठ्या कालावधीनंतर दुकाने उघडल्यास बाजारपेठेत मोठी गर्दी होवून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. मात्र येत्या 25 मे रोजी मुस्लिमांचा रमजान ईद हा सण येत असल्याने व मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्यक वगळता उर्वरित सर्व व्यवहार ठप्प असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. संगमनेर शहर हॉटस्पॉट क्षेत्रात असल्याने येत्या 23 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शहरात निर्बंध कायम आहेत. त्यामुळेच अनेक व्यापाऱ्यांनी 24 मे रोजी दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांमधील भीती आणि सध्याची स्थिती, यावर विचार विनिमय करण्यासाठी व्यापाऱ्यांचे संघटन असलेल्या संगमनेर व्यापारी असोसिएशनने आज सकाळी सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावर अंतिम निर्णय घेताना येत्या 24 मे रोजी व्यवहार सुरु न करता रमजान ईदनंतर 26 मे रोजी संगमनेरातील सर्व दुकाने उघडण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
संगमनेरातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची भेट घेवून त्यांना समाजाच्यावतीने निवेदन दिले. यंदाची रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय समाजाने घेतला असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने 31 मे पर्यंत संगमनेर शहरातील दुकाने सुरु करण्यास परवानगी देवू नये, अशी मागणीही या निवेदनातून केली गेली आहे. या निवेदनावर नगरसेवक वसीम नूरमहम्मद शेख, नूरमहम्मद पीरमहंम्मद शेख, डॉ. दानिश रईस खान, आरिफ देशमुख, रिजवान अब्दुल वाहीद, नसीमबानो इसहाकखान पठाण, शबाना रईस बेपारी व शमा अहमद शेख आदींच्या सह्या आहेत.
संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत संगमनेरातील व्यवहार 26 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेरातील सर्व व्यापारी बांधव या निर्णयाचे स्वागत करतील, असे अपेक्षित आहे. दुकाने सुरू करताना व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडून सूचित केलेल्या गोष्टींची पूर्तता करावी. अनावश्यक गर्दी महामारीचे संक्रमण वाढवणारी ठरेल, याचे प्रत्येकाने स्मरण ठेवूनच कामकाज करावे. शहरातील सर्व व्यापारी असोसिएशनच्या निर्णयासोबत असतील, असा विश्वास आहे.
नीलेश जाजू ,अध्यक्ष, संगमनेर व्यापारी असोसिएशन