नालासोपारा – वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आज या परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणाऱ्या १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नालासोपारा येथील आचोळे परिसरातील विनायका रुग्णालयातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर नालासोपारा रिद्धीविनायक रुग्णालयात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका करोना बाधित रुग्णाचा मृत्यू कृष्णा रुग्णालयात झाला असून इतर दोन वसईच्या ग्रामीण भागात दगावले असल्याची माहिती मिळते आहे. या सर्व बाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
मात्र, रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ असल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यभरात रेमडिसिव्हीरचा अभाव असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.