नवी दिल्ली – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या समोर आढळून आलेली गाडी आणि मनसूख हिरेन हत्या या दोन प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं.त्यातच हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिल्याने सरकार अडचणीत आल्याच्या चर्चा होत्या. मात्र या प्रकरणांचा तपास करणाऱ्या पथकाच्या प्रमुखांची बदली झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक दावा केला आहे.
तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. त्यामुळं त्यांची बादली करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं. मात्र केंद्र सरकारला हे मान्य नसावं, अशी शंका हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात वाझेसह परमबीर सिंग सामील असतील. या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण तपास सुरू असताना शुक्ला यांची बदली कशासाठी ? काहीतरी शिजत असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
दुसरीकडे एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल शुक्ला केंद्रशासित प्रदेशातील आयपीएस अधिकारी असून त्यांची पाच वर्षांसाठी ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर रिक्त झालेल्या महानिरीक्षकपदी उपमहानिरीक्षक ज्ञानेंद्रकुमार वर्मा यांना बढती देण्यात आली होती. आता दोन्ही प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी वर्मा यांच्याकडे देण्यात येईल, असं ‘एनआयए’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.