मुंबई : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात एका वृद्धाने स्वतःचे सरण रचून सोबतच विधीवत पूजा-अर्चाना करून आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
किन्ही गावातील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा-अर्चाना करून आत्महत्या केली. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी किन्ही गावाबाहेरील असलेल्या त्यांच्याच शेतात घडल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते तसेच ते नेहमी आजारी असायचे. परंतु मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती उत्तम होती. तरीही अशाप्रकारे आत्महत्या करण्याचं काय कारण असू शकते, यासंदर्भात आता गावात चर्चांना उधाण आले आहे. आत्महत्या केली त्याच दिवशी आत्माराम यांनी गावात मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला.
पहाटे पाच वाजता आत्माराम शेताकडे आले. शेतात असलेली लाकडं एकत्र करून सरण रचले त्यावर सुकं गवत टाकलं. त्याअगोदर आत्माराम यांनी सरणाची पूजा केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूजा केल्याचा अंदाज व्यक्त करण्यामागील कारण म्हणजे सरणाजवळ दिवा पेटत होता. तसेच पानाचा विडा ठेवलेला होता.
पूजा केल्यानंतर आत्माराम यांनी सरण पेटवून त्यावर उडी टाकली असावी. मात्र त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. वेलतुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला व पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी वेलतुर येथे पाठविण्यात आले आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळी चिता पाहण्यासाठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास करीत आहे. दरम्यान स्वतःच सरण रचून ८० वर्षीय वृद्धाने आत्महत्या कशी काय केली असावी, असा प्रश्न अनुत्तरित आहे. वृद्ध माणूस सर्व काही आलबेल असताना आत्महत्येचा विचार कसा काय करू शकतो? तोही स्वतःच सरण रचून स्वतः आगीच्या स्वाधीन होऊन आत्महत्या कशी काय करू शकेल? असे नानाविध प्रश्न सध्या गावात चर्चेत आहेत. परंतू या प्रकरणामध्ये आत्माराम यांच्या घरच्यांचे काही म्हणणे नसल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत गुन्हा तपासात करीत आहे.