मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यावर आता संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.यावेळी बोलताना त्यांनी आमच्यासाठी ईडीची नोटीस हा महत्त्वाचा विषय नाही. ईडीची नोटीस येणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हे लोकांनी गृहीत धरलं आहे.तसेच नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल असा अप्रत्यक्ष इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
ईडीच्या नोटीसीवर बोलताना, कालपासून आपण सगळे, खासकरुन मीडिया एक प्रश्न विचारत आहे, ईडीच्या नोटीसचं काय झालं? आपण मला घरी भेटलात, सामनात भेटलात, शिवसेना कार्यालयात भेटलात, मी नेहमी तुमच्याशी बोलत असतो. आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही असे संजय राऊत म्हणाले.तसेच बायकांच्या पदरा आड लपून खेळ करणं बंद करा आणि हे खेळ बंद झाले नाहीत तर ते तुम्हाला महागात पडतील असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
तसेच सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं.
गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात असा केंद्र सरकारवर आरोप केला.
कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या.आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच राजकारणात समोरा समोर लढण्याची धमक हवी असे सांगत त्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांचे उदाहरण दिले.