मुंबई – अंमलबजावणी संचनालयाची कारवाई करणे म्हणजे एका राजकीय पक्षाने आपली भडास काढणे आहे. कुटुंबातील महिलांवर मुलांवर राग काढणार असाल तर त्याच पध्दतीने उत्तर देऊ. भारतीय जनता पक्षाच्या 120 जणांच्या गैरमर्गाने केलेल्या संपत्तीची माझ्याकडे यादी आहे. आधी त्यांची चौकशी करा मग मी 10 वर्षापुर्वी काढलेल्या कर्जाची चौकशी करा.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले. त्याच बरोबर हे सरकार पाडण्याचा विडा भाजपाच्या नेत्यांनी उचलला असून त्यासाठी सरकारी यत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गटप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत व्यक्तीगत आणि पक्षाची याबाबतची भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे काही मध्यस्थ गेल्या महिन्यापासून मला भेटत आहेत. महाराष्ट्रातील सरकार टीकू देऊ नका. आमची यंत्रणा त्यासाठी काम करत आहेत. सीबीआय, इडी आणि आयकर विभागाला हाताशी धरून हे सरकार महिन्याच्या आत पाडणार आहोत. पण मी त्यांचा बाप असल्याने त्यांच्या धमकावण्याला मी भीक घातली नाही.
आम्ही सरकारमधील 22 आमदारांची यादी बनवली आहे. त्यांना इडीकडे बोलावून त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेणार आहोत. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन आहे, असे या हस्तकांनी मला सांगितले. पण हे सरकार पडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवावे, असेही राऊत यांनी ठणकावले.
माझ्याकडेही भाजपा नेत्यांच्या भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीची यादी आहे. त्याचे पुरावे आहेत आम्ही योग्य वेळी ते बाहेर काढू. पण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या लढ्यात त्या नेत्यांची मुले आणि कुटुंबियांना आणू नका, असे सांगितले आहे. त्यामुळे मी गप्प आहे. या मार्गाने भाजपाला वाटते तसे काही होणार नाही.
या सरकारचा केसही वाकडा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बायकांच्या पदरा आडून लढण्याची यांची पध्दत आहे. इडीची नोटीस आली आहे. त्याला आम्ही उत्तर देऊ. 10 वर्षापुर्वी घर घेण्यासाठी शिक्षक असणाऱ्या माझ्या पत्नीने कर्ज घेतले होते. माझ्या राज्यसभेच्या अर्जात त्या कर्जाचा उल्लेख होता. इडीचा माझा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांना हवी ती कागदपत्रे आम्ही पाठवली आहेत, असे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या नेत्याची संपत्ती 1600 पटींनी वाढली त्याची चौकशी करणार का? असा सवाल करून राऊत म्हणाले, आधी त्यांच्या चौकशी करा मग माझी 10 वर्षापुर्वी घेतलेल्या कर्जाची चौकशी करा, असे आव्हानही त्यांनी इडीला दिले.
जर चुकीचे काही केले नसेल तर घाबरायचे कारण नाही असे ऐतिहासिक विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. आम्ही कोणालाही घाबरत नाही. तुमच्या भविष्याची आम्हाला गरज नाही. आमच्यापैकी कोणीही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज आम्हाला नाही. पण, यापुढे तुम्हाला घाबरावे लागेल. आमच्या महिला आणि मुलांवर हल्ले करण्याची नामर्दांनगी कोणी करणार असेल तर आम्ही शिवसेनेच्या पध्दतीने उत्तर देऊ. आम्ही कोणत्याही थराला जाऊ, असेही राऊत यांनी खडसावले.
राजकीयदृष्ट्या कोणत्या पक्षाला आणि व्यक्तींना संपवायचे असेल तर इडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर केला जातो. वर्षभरात सुरवातीला शरद पावार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाइरक, अरविंद सावंत यांना नोटीस बजावण्यात आली. पण यातील कोणीही दबावाला बळी पडले नाही म्हणून आम्हाला नोटीसीचे कागद पाठवता, असे ते म्हणाले.
भाजप नेत्यांचे इडीत हेलपाटे
भाजपाचे तीन नेते इडीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे घालत आहेत. खरे तर तेथे बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मिळत नाही. तेथून कागदपत्रे बाहेर घेऊन जात आहेत. त्याआधारे आरोप करत आहेत. त्या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तुम्ही तपासून घ्या. म्हणजे हे नेते कोण होते हे तुम्हाला समजेल. आपण शोध पत्रकारिता करता तेंव्हा याही गोष्टीचा शोध आपण घ्यावा, असे त्यांनी सांगितले. माझी चौकशी कर्जाच्या प्रकरणाशी संबंधित हे भाजपाच्या नेत्यांना कोणी सांगितले, असा सवालही त्यांनी केला.