शिवसेनेच्या नेत्यांचे युतीच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठपलेली असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी चालविली आहे. फलकबाजीतून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न चालविलेला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेना, कॉंग्रेस, मनसे आणि वंचित आघाडीमध्ये मात्र अद्यापही शांतताच आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष असून मनसेच, वंचित आणि कॉंग्रेसही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.
युतीचे अद्याप तळ्यात-मळ्यात असून कॉंग्रेस आणि वंचित आघाडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे युती, आघाडी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच भाजपाने मात्र आपले तीनही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रभारी, संयोजक आणि सहसंयोजकांचा समावेश आहे. एका बाजूला नियुक्त्या जाहीर करताना आमदार म्हणून तसेच भाजपा शासनाने केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघातही भाजपाने वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
एका बाजूला भाजपाने निवडणूकपूर्व तयारीत आघाडी घेतलेली असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये मात्र शांतता आहे. “गयारामां’मुळे राज्यपातळीवरील नेते घायाळ झालेले असल्याने त्यांचे स्थानिक पातळीवर लक्ष नाही. तर स्थानिकांमध्येही पिंपरी वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या लक्षणीय घटल्याने पक्ष पातळीवर भूमिका मांडण्यासाठीही पदाधिकारी पुढे येताना दिसून येत नाही. उमेदवारी कोणाला मिळणार याची खात्री कोणालाच नसल्याने तसेच अंतर्गत हेव्यादाव्यातून पक्ष बाहेर पडायलाच तयार नसल्याने अडचणीत वाढच झाली आहे. त्यातच वरिष्ठांकडूनह कोणताच संदेश येत नसल्याने इच्छुक आणि नगरसेवक वरिष्ठांच्या आदेशाकडे केवळ लक्ष ठेऊन असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या काही इच्छुकांनी तीनही मतदारसंघात तयारी सुरु केली असली तरी ती वैयक्तिक पातळीवर असून पक्षपातळीवर अद्याप कोणतीच तयारी दिसून येत नाही. युतीचा निर्णय झाल्यानंतरच पुढचे पाहू, असे इच्छुकांकडून सांगण्यात येत आहे. तर वंचितकडे शहरात पक्षबांधणी नसल्यामुळे या पक्षातही अद्याप शांतता आहे. मनसेची प्रदेश पातळीवरून कोणतेच आदेश नसल्याने या पक्षातही विधानसभेची सुरू झालेली नाही. कॉंग्रेसचीही अशीच अवस्था असून सचिन साठे पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्नशील असले तरी अपेक्षित साथ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये शांतता आहे.