पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) द्वारे आयसीएसई म्हणजेच इयत्ता दहावी आणि आयएससी म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
देशाचा निकाल पाहता इयत्ता दहावीमध्ये ९९.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर बारावी मध्ये ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
देशातील इयत्ता दहावीसाठी २ हजार ६९५, तर बारावीसाठी १ हजार ३६६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील वर्षाप्रमाणे यंदाही आयसीएसई आणि आयएससी या दोन्ही वर्गांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९९.६५ टक्के मुली आणि ९९.३१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे १२ वीमध्ये ९८.९२ टक्के मुली आणि ९७.५३ टक्के मुले यशस्वी झाली आहेत.
दहावीसाठी २ लाख ४३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी २ लाख ४२ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेला ९९ हजार ९०१ विद्यार्थी बसले आणि त्यापैकी ९८ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २६९५ शाळांपैकी ८२.४८ टक्के (२२२३) शाळांमधील विद्यार्थी १०० टक्क्यांसह दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण, तर १३६६ शाळांपैकी ६६.१८ टक्के (९०४) शाळांमधील विद्यार्थी १०० टक्के गुणांसह बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्रातील निकाल
सीआयएससीई बोर्डाचा महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावीसाठी २६५, तर बारावीसाठी ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात दहावीचा निकाल ९९.९६ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७१ टक्के लागला. यात दहावीच्या निकालात मुलींचा निकाल ९९.९९ टक्के, मुलांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात मुलींचा निकाल ९९.८६ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.५४ टक्के लागला.