सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय देशासाठी दुर्दैवी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा हा निर्णय असून शरद पवार यांनी हा निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शरद पवार यांनी मुंबई येथील कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सातारा येथील राष्ट्रवादी भवनात आ. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”शरद पवार यांनी “लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अचानक अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कार्यकर्तेही अवाक् झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
शरद पवार यांचा निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी असून ते राजकारणात, समाजकारणात ते प्रचंड सक्रिय आहेत. भाकरी फिरवण्याबाबत ते फक्त मुंबईच्या पदाधिकाऱ्यांविषयी ते बोलले होते. महापालिकेच्या दृष्टीने नवे चेहरे आणण्यासाठी हे वक्तव्य होते.” शरद पवार यांच्या निर्णयाबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.
अजित पवार यांची भूमिका वेगळी नाही
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार यांची कुठलीही वेगळी भूमिका नाही. राज्यातील काही भागात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावले होते. ती भूमिका अजित पवार यांची नसून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुठलेही गट- तट नाहीत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.