सातारा – एखादा शब्द मागे पुढे झाला म्हणून मोठी टीका करण्यात काय अर्थ. त्यावर लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दहा महिन्यात जी चांगली कामे केली, त्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बोलावे. त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर विरोधी पक्ष नेते म्हणून बोलावे. पण, आम्हाला कसला मुख्यमंत्री मिळाला आहे, दुर्दैव आहे, असे ते म्हणत असतील तर “धरणात पाणी नाही मग काय करु’ असे म्हणणारा उपमुख्यमंत्रीही आम्हाला मिळाला होता, असे आम्ही म्हणालो तर ते त्यांना आवडेल का? असा खोचक सवाल उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
मंत्री देसाई यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “”एका सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून एक शब्द चुकीचा बोलला गेला. त्यावर अजित पवारांनी टीका केली होती. पण बोलताना असे “स्लिप ऑफ टंग’ होऊ शकते. अजित पवार यांना त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेशही करावा लागला होता. येथे तर मुख्यमंत्र्यांकडून चुकून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग म्हटले गेले. त्याचे मोठे भांडवल करण्याची गरज नाही.”
लोक माझे सांगाती, यामध्ये पहाटेच्या शपथविधीवर काय लिहिले आहे, वस्तुस्थिती काय आहे, यावर अजित पवारांनी बोलावे. श्री. पवार यांनी त्यात काय लिहिले आहे हे माहिती नाही. एखादा शब्द मागे पुढे झाला, यावर लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दहा महिन्यात जी कामे केली, त्याबाबत श्री. पवार यांनी बोलावे. त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर विरोधीपक्ष नेते म्हणून बोलावे. बारसू येथे प्रकल्प करा, असे उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र दिले होते. ते पत्र ग्राह्य धरायचे की, “आता आगीत तेल ओतायची भूमिका ग्राह्य धरायची?’ तुमच्या भुमिका दुटप्पी आहेत. ते दिलेले पत्र माझे नाही, ती सही माझी नाही, त्यावेळी ती भूमिका माझी नव्हती, हे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही मंत्री देसाईंनी दिले. लाठीचार्ज केला नसतानाही लाठीचार्ज केला म्हणायचे. ‘जालियनवाला बाग’ असा उल्लेख खासदार संजय राऊत करतात. भडकावू वक्तव्ये करुन राज्यातील वातावरण चिघळवले जात आहे. पुढील कॅबिनेट बैठकीत भडकावू वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आजही आदर आहे. मात्र, कोणाला जमीन दाखवायची, कोणाला आस्मान दाखवायचे, हे शिवसेनेच्या 40 आमदारांनी दहा महिन्यांपूर्वीच दाखवून दिले आहे.
तुम्ही कितीही टीका केली तरी आम्ही तुम्हाला कामातून उत्तर देऊ. मुंबईसह राज्यातील महापालिका, पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रथम क्रमांकावर येऊ, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. पण, त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना त्याबाबतचे अधिकार असून त्यांनीच मुख्यमंत्री कोणी करायचा ते ठरवावे. आमच्या पक्षाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे अधिकार असून ते जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असेही मंत्री देसाईंनी सांगितले.
बाजार समितीत सर्वाधिक यश महाविकास आघाडीला मिळाल्याचे सांगितले जात असले तरीही भाजप हा समितीत सर्वाधिक यश मिळवणारा पक्ष ठरला आहे. शिवसेना यापूर्वी सहकार क्षेत्रात कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातही शिवसेनेचा प्रभाव वाढत आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी विरोधात परिवर्तन सुरु झाले आहे. शिवसेना, भाजप हे सातारा जिल्ह्यात मजबूत करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. वज्रमूठ सभेला गर्दी होते असे सांगणाऱ्यांनी आमच्या दसऱ्या मेळाव्यातील गर्दी आणि जागा बघावी म्हणजे नक्की कोणाच्या सभेला गर्दी होती, ते समजेल. त्यांनी खुशाल स्वत:ची पाठ थोपटून घ्यावी. पोडियम हलवण्यावरुन सभेत वाद होतात. तीन पक्षांचे एकमत होत नसेल तर आमच्या विरोधात काय लढणार, अशी टीकाही मंत्री देसाईंनी केली.
जिल्ह्यात परिवर्तन सुरू
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून माझा पराभव झाला होता. त्याच सोसायटी गटातील आमच्या जागा बहुमताने विजयी झाल्या असून हे परिवर्तन आहे. 40 वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. मी केवळ एक मेळावा घेतला होता. रविराज देसाई, यशराज देसाई व देसाई गटातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या समन्वयातून हे यश मिळाले आहे, असे सांगून बाजार समितीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी एक महिन्याच्या आत सहकार विभाग, पणन विभाग, एनसीडीसी या केंद्रीय समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.