जामखेड – राष्ट्रवादी कॉंग्रेस हा बोलघेवड्यांचा पक्ष झालेला आहे. शाहू- फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या पक्षात नाहीत. हा पक्ष जातीयवादाचे विष कालवण्याचे काम करत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करण्याऐवजी युती सरकारच्या काळात झालेली विकासकामे जनतेसमोर आणावीत. म्हणजे या निवडणुकीत त्यांचा सुफडा साफ होईल, असे मत आ. सुरेश धस यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील साकत येथे महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. माजी पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवान मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, अनिल लोखंडे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रवी सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद, गणेश कोल्हे, हनुमंत उतेकर, विठ्ठल राऊत, प्रा. अरुण वराट, शरद भोरे, काकासाहेब चव्हाण, नासीर खान, गणेश काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आ. धस म्हणाले, सध्या राज्यात कर्जत-जामखेडमतदारसंघाची चर्चा आहे. तिही फक्त फेसबुक व व्हॉट्स ऍपवर आहे. कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे. युती सरकारने केलेली विकासकामे जनतेला सांगा, म्हणजे समोरच्या उमेदवाराला निवडणूक टाईट जाईल, तसेच पूर्वी वंशपरंपरागत राजे पदावर येत होते. आता लोकशाहीमुळे मतपेटीतून राजा निवडला जात आहे. आघाडी सरकारच्या काळात निधी हजारांत मिळत होता. आता युती शासनाच्या काळात कोटींत निधी मिळत आहे. ईव्हीएम मशिन विषयी बोलताना धस म्हणाले, जर मशिनमध्ये घोटाळे असते, तर खा. सुप्रिया सुळे निवडून आल्या नसत्या.