पिंपरी (प्रतिनिधी) – राज्य परिवहन महमंडळाच्या बसला होणारे वाढते अपघात टाळण्यासाठी चालक, वाहकांना दोन कर्तव्यामध्ये ९ तास विश्रांती देण्याच्या सूचना पुणे विभागातील आगारांना देण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड, तळेगावसह शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरूनगर, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, मंचर आदी आगारातील आगार व्यवस्थापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून त्यात मोफत प्रवासापासून ते ज्येष्ठ नागरिक, महिलांना ५० टक्के सवलतींचा समावेश आहे. परिणामी प्रवाशांची संख्या वाढत आहे. तसेच सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणूनही एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय खासगी बसचे वाढते दर पहाता, अनेकजण एसटी बसने प्रवास करणे पसंत करतात.
परिणामी एसटी बसच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच उन्हाळी सुट्या लागल्याने तसेच मतदानासाठी गावी जात आहेत. परिणामी एसटी बसला गर्दी होत आहे. २१ एप्रिल रोजी नाशिक – पुणे – भोर या एसटी बसला गंभीर अपघात झाला. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी राज्य परिवहन दोन कर्तव्यामध्ये चालक, वाहकांना ९ तास विश्रांती देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
सुरक्षित प्रवास
एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. महिला सुरक्षितता आणि अपघातांच्या बाबतील एसटी बस सुरक्षित समजली जाते. त्यामुळे प्रवासासाठी एसटी बसला प्राधान्य दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये चालक, वाहकांच्या अपुऱ्या विश्रांतीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सक्तीच्या विश्रांतीची सूचना देण्यात आली आहे.
अशी आहे सूचना
आगारात चालक, वाहक मुक्कामी कर्तव्यावर असताना ९ तास विश्रांती न घेता परस्पर परतीची कामगिरी करतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालक, वाहकांना २ कर्तव्यामध्ये ९ तास विश्रांती घेऊनच मार्गस्थ होण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच या पुढे अपघाताची पुनरावृत्ती घडल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे म्हटले आहे.