खडकवासला -खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुली पाण्यात बुडाल्या होत्या. पण, स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचवण्यात यश आले आहे. परंतु, दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
शीतल भगवान टिटोरे, खुशी संजय खुर्दे अशी मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आहेत. दरम्यान, संजय माताळे यांनी मुलींना पाण्याबाहेर काढले तर राजेंद्र जोरी यांनी मुलींना त्यांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यासाठी, पोटातील पाणी काढण्याची मदत केली.
हवेली तालुक्यातील मालखेड गावचे माजी सरपंच राजेंद्र जोरी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गोऱ्हे खुर्द या ठिकाणी सावडण्याच्या विधीसाठी गेले होते. स्मशानभूमीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या नदीपात्राच्या ठिकाणावरून अचानक वाचवा..वाचवा…, अशी आरडाओरडा सुरू असल्याचे जोरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ऐकू आले. क्षणाचाही विलंब न करता सावडण्याच्या विधी ठिकाणाहून संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे, रमेश भामे हे आवाजाच्या दिशेने मदतीसाठी धावले. पाण्यात उड्या घेत त्यांनी मीना लहाने, शीतल धामणे, राशी मांडवे, पायल लहाने, प्रीती लहाने, कुमुद खुर्दे, पायल सावडे यांना पाण्याबाहेर काढले.