शिवतक्रार म्हाळुंगीच्या बंधाऱ्यातून गळती : दौंड तालुक्यातील शेतकरी संतापले
राहू (वार्ताहर)- दौंड तालुक्यात अनेक गावांच्या शेतीसाठी वरदान ठरलेल्या शिवतक्रार म्हाळुंगीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. अशीच गळती राहिल्यास बंधारा आठ दिवसांतच रिकामा होण्याची शक्यता आहे. अनेकवेळा तक्रारी करून देखील पाटबंधारे विभागावर परिणाम झाला नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भोंगळ कारभाराने शेतकरी संतापले आहेत.
बंधाऱ्यात आज पाणी दिसत असले तरी या वेगाने जर गळती होत राहिली तर लवकरच बंधारा कोरडा ठाक होऊ शकतो. टाकळी भीमा व आसपासच्या गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधीत कर्मचऱ्याशी संपर्क करून परिस्थिती सांगितली. परंतु काही एक फरक पडला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संदर्भात अनेकवेळा संबंधीत कार्यालयाशी संपर्क केला. परंतु प्रतिसाद मिळू शकला नाही.
शिवतक्रार म्हाळुंगीच्या बंधाऱ्याचे मध्य भागातील ढापे हे खराब होऊन तुटलेले आहेत. त्यामुळे खूप वेगाने पाणी खाली वाहून जात आहे. प्रत्येक सिझनला हीच समस्या होते. कोठे तरी जाणून बुजून हा विषय केला जातो की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. गळतीबरोबर बंधाऱ्यावर मोठी झाडे उगवली.
संबंधित विभागाचे इतके दुर्लक्ष आहे की, मोठ्या प्रमाणात गळती तर आहेच परंतु बंधाऱ्यावर मोठी झाडे देखील उगवली आहेत. अधिकाऱ्यांचे मोठ्या बंधाऱ्याकडे लक्ष नसल्याचे यातून दिसून येत आहे. बंधाऱ्याची निर्मिती ही पंचवीस ते तीस वर्षांच्या आसपास झाले आहे.तसेच आत्तापर्यंत कोणतीही मोठी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे बंधारा पूर्णपणे मोडकळीस आला आहे. हे बंधारे दगडामध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड निसटून पाणी गळत आहे. एका ठिकाणी दुरुस्ती केले की दुसरीकडून पाणी गळत आहे.
जड वाहतुकीमुळे बंधारा धोकादायक
बंधारे हे वाहतुकीसाठी नसले तरी त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक चालू असते. त्यामध्ये ऊस, माती यासारख्या वाहतुकीमुळे बंधारा मोडकळीस आला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. जड वाहतूक होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या. परंतु त्या कुचकामी ठरल्या आहेत.