डॉ. मेघश्री दळवी
बदलत्या हवामानाने आपले ऋतू पार उलटसुलट केले आहेत. आता आपल्याला आपला भूगोलही बदलताना पाहावा लागणार आहे. हिमनद्या (ग्लेशियर) वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत जाईल आणि किनाऱ्यालगतची शहरं हळूहळू पाण्याखाली जातील. येत्या दहा ते पन्नास वर्षांत ही शहरं नाहीशी होऊ शकतात हे सत्य पचवणं जड आहे खरं. पण आता ते अपरिहार्य दिसत आहे.
या अशा बदलाची एक झलक अलीकडेच दिसली. इंडोनेशियाची राजधानी असलेलं जकार्ता शहर झपाट्याने खचतं आहे आणि म्हणून लवकरच इंडोनेशियाची राजधानी आता बोर्निओ इथे हलवण्यात येणार आहे. त्यात भर म्हणून रशियाने नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की आर्क्टिक बर्फ वेगाने वितळत गेल्याने त्याखालील पाच नवी बेटं आता उघडी पडली आहेत.
रशियाच्या उत्तरेकडे असलेल्या समुद्रात ही नवी बेटं रशियाच्या नाविक दलाला ठळकपणे दिसली आणि आता त्यांची अधिकृतपणे नोंद झाली आहे. नोवाया झेमिल्या द्वीपसमूहात ही बेटं आहेत. त्यांच्यावरचा बर्फ वितळल्याने ती एका मोठ्या बेटाचा भाग नसून छोटी छोटी वेगळी बेटं आहेत हे निश्चित झालं आहे. पृथ्वीचा भूगोल बदलत जाण्याची ही नांदी म्हटली पाहिजे. त्या परिसरातलं वाढतं तापमान आणि त्यामुळे हिमनद्यांचं वितळणं ही त्यामागची कारणं.
पत्रकार परिषदेत बोलताना रशियाच्या व्हाईस ऍडमिरलनी या पाच बेटांची अधिक माहिती दिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी या बेटांची शंका त्यांना आली होती. अलीकडे झालेल्या एका मोहिमेत त्यांनी त्या बेटांची पूर्ण माहिती गोळा केली. त्यातली दोन बेटं अगदी इवलीशी, जेमतेम हजार चौरस मीटरची आहेत. तर सर्वात मोठं बेट पन्नास हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाचं आहे. या द्वीपसमूहाचा बराच भाग नान्सेन हिमनदीने व्यापलेला आहे. ती हळूहळू वितळत आहे. या पाच बेटांच्या सोबत आणखी एक खडकाळ भाग तिथे उघडा पडला असण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पुढील मोहीम निघणार आहे. नान्सेन हिमनदी आणखी वितळली तर मात्र तो भूभाग खूप बदलून जाणार आहे. तिथलं तापमान गेल्या काही वर्षांमध्ये पाच-सहा अंश सेल्सियसने वाढल्याचं सांगण्यात येत आहे. ही वाढ लक्षणीय आहे आणि तिचे परिणाम असे दिसायला लागले आहेत.
या पाच बेटांचं भवितव्य काय हे एवढ्यात सांगता येणार नाही. पण त्यांच्यावर थोडं शैवाल, थोडी झुडपं दिसायला लागली आहेत. झुडुपांमुळे काही पक्षी या बेटांना भेट देऊ लागले आहेत, तर एका सील माशाचे काही अवशेषदेखील तिथे आढळले आहेत. याचाच अर्थ असा की तिथे आज ना उद्या एक परिसंस्था (इकोसिस्टिम) बहरू शकते. अर्थात, तोवर त्या भागात आणखी काही मोठे बदल झाले नाहीत तर!