भारतीय ज्योतिष अर्थात खगोलविज्ञान या वैज्ञानिक ग्रंथाचे लेखक, भारतीय ज्योतिष शास्त्रविशारद व गणिती शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा आज स्मृतिदिन (निधन 27 एप्रिल 1898). त्यांचा जन्म 21 जुलै 1853 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड गावी झाला.
मुरूड येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी दापोली न्यायालयात अर्ज लिहून देणे वगैरे उमेदवारीची कामे केली. त्यावेळी ते इंग्रजी शिकले. वर्ष 1870 मधे त्यांनी पुण्यास प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथे तीन वर्षे शिक्षण घेतले आणि त्याच काळात त्यांनी मॅट्रिक्युलेशनचा अभ्यास केला. 1874 साली ते प्रथम श्रेणीत मॅट्रिक झाले. त्यानंतर ते शिक्षण खात्यात रूजू झाले.
रेवदंडा, ठाणे, बार्शी येथे शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केल्यावर धुळे येथील ‘प्रशिक्षण विद्यालया’मध्ये रूजू झाले. वर्ष 1894 मधे त्यांची पुणे प्रशिक्षण विद्यालयामध्ये नेमणूक झाली. तेथेच ते अखेरपर्यंत कार्यरत होते. या नोकरीत फुरसतीच्या काळात त्यांनी भारतीय ज्योतिषशास्त्राचा कसून अभ्यास केला. आज ज्याला ‘खगोलविज्ञान’ या नावाने ओळखले जाते, त्यालाच त्या काळात ‘ज्योतिषशास्त्र’ असे म्हणत असत. विसाजी कृष्ण लेले यांचे सायनवादाशी संबंधित लेख वाचून त्यांना ज्योतिष शास्त्राची आवड निर्माण झाली. ज्यांना ते गुरू मानत असत त्या ठाणे येथील जनार्दन बालाजी मोडक यांच्या मैत्रीमुळे त्यांची कालगणनेची आवड आणखी वाढली. डॉ. फ्लीट या इतिहास संशोधकाने त्यांच्या ‘गुप्त शिलालेख’ या पुस्तकात गुप्तांचा कालखंड ठरवण्यासाठी दीक्षित यांची मदत घेतली. त्याचप्रमाणे सेवेल यांचे ‘भारतीय दिनदर्शिका’ हे पुस्तक देखील दीक्षितांच्या मदतीने पूर्ण झाले.
त्यांचा पाश्चात्य आणि पौर्वात्य ज्योतिषशास्त्राचा (कालगणना) सखोल अभ्यास होता. त्यामुळे ते ज्योतिषशास्त्राशी संबंधित विषयांवर अधिकारवाणीने बोलत असत. पेशवाई संपुष्टात आल्यावर इंग्रज सरकारने पेशव्यांचे विद्वान लोकांना पुरस्कार देण्याचे धोरण दक्षिणा पुरस्कार समितीमार्फत चालूच ठेवले होते. दीक्षित यांच्या ‘भारतीय ज्योतिष’ या पुस्तकाला दक्षिणा पुरस्कार समितीमार्फत पुरस्कार दिला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्यातील आनंदाश्रम येथील 500 पुस्तकांचा अभ्यास केला होता. या पुस्तकामुळे आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी लेखकांचा परिचय मराठीत सुलभ झाला.
पंचांग दुरुस्तीशी संबंधित साहित्याचा संग्रह आणि त्याच्या बाजूने आणि विरुद्ध विविध युक्तिवाद यात बघता येतात. या पुस्तकात सायन पंचांगाची स्वीकारार्हता, वेदांची प्राचीनता आणि ज्योतिषशास्त्रातील गणिताचे भारतीयत्व इत्यादींबद्दलची त्यांची मतेही पाहता येतील. त्यांच्या युक्तिवादाने थिबो, बर्जेस इत्यादी युरोपियन विद्वानांचे गैरसमज दूर झाले. ‘भारतवर्षीय भूवर्णन’ हा दीक्षितांचा असाच एक महत्त्वाचा ग्रंथ.
या अभ्यासपूर्ण ग्रंथात भारताच्या ऐतिहासिक भूगोलाची माहिती आहे. यामधे ऐतिहासिक काळातील नगरे, राज्ये आणि नद्या आज कुठे आहेत आणि त्यांची सध्याची प्रचलित नावे कोणती, हे समजते. या ग्रंथाचा हिंदी समितीने प्रकाशित केलेला अनुवाद अनुक्रमणिकेसह 711 पानांचा आहे.त्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. पहिला भाग वैदिक कालखंड आणि वेदांग कालखंडातील ज्योतिषशास्त्राचा विकास आणि दुसरा भाग ज्योतिष सिद्धांत काळात ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे.