वॉशिंग्टन- अमेरिकेने काश्मीर प्रकरणात आत्तापर्यंत भारताला पुर्ण पाठिंबा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने या प्रकरणात अत्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आहे त्याबद्दल भारत समाधानी आहे असे अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटले आहे.
त्यांच्या निवासस्थानी दिवाळी साजरी करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ट्रम्प प्रशासनातील अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि राजनितीज्ञ उपस्थित होते.
श्रृंगला म्हणाले की काश्मीरच्या बाबतीत सरकारने अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. त्याला अमेरिकेने पुर्ण पाठिंबा दिला आहे असे आत्तापर्यंत कधीही झाले नव्हते. अमेरिकेच्या सिनेट मधील अनेकांनीही भारताला समर्थन दिल्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. हाऊडी मोदी कार्यक्रमाला अमेरिकेने दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी यावेळी आभार मानले.