कोणताही व्यवहार न करता खात्यात लाखो, करोडो रुपये जमा झालेले पाहून सर्वच ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. काही खातेदार हे पैसे खर्च करतील तर थोडे लोक कदाचित रक्कम अन्य खात्यांमध्ये वळती करतील. अशा रकमेला हात न लावता बँकेकडे तक्रार करणारे सुजाण नागरिक देखील आहेत; परंतु बँकेला असे चुकून ट्रान्सफर झालेले पैसे वसूल करण्यासाठी कायद्यात तरतूद आहे का?
कमर्शियल बँक ऑफ इथियोपिया (सीबीई) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मार्च महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे या बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातील असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिसली व खात्यातून काढता आली. या गडबडीत बँकेचे एकूण 14 दशलक्ष डॉलर्स इतके नुकसान झाले. एप्रिल महिन्यात यातील तीन चतुर्थांश रक्कम परत मिळवण्यात बँकेला यश आले. काही ग्राहकांनी मात्र खात्यातील जास्त असलेली रक्कम काढून सरळ खर्च केली आणि तांत्रिक बिघाडामुळे मिळालेले हे पैसे परत करण्यास नकार दिला. अशा ग्राहकांची नावे आणि फोटो असलेले पोस्टर्स अधिकार्यांनी बँकेच्या विविध शाखांबाहेर लावले. पुढील कायदेशीर मार्ग ठरवून जे लोक पैसे परत करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे बँक अधिकार्यांनी सांगितले.
खात्यात अचानक लाखो करोडो रुपये जमा झाले तर आनंदच होईल. पण भारतात अशा घटना कधी घडल्या आहेत का? होय, विविध तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा मोठ्या रकमा चुकीच्या खात्यात पोचल्या होत्या. यादीत नुकतेच घडलेले लक्षवेधी किस्से आहेत. एचडीएफसी, कोटक महिंद्रा व युको बँकेतील. मे 2022 मध्ये, एचडीएफसी बँकेच्या टी-नगर (चेन्नई) शाखेतील सुमारे 100 खात्यांत प्रत्येकी 13 कोटी जमा झाले होते. ऑक्टोबर 2023 दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे कोटक महिंद्रा बँकेच्या तेनमपेट (चेन्नई) शाखेतील एका ग्राहकाला खात्यात 753 कोटी आले. पुढे, डिसेंबर 2023 मध्ये, एका मोठ्या घोटाळ्यामुळे युको बँकेच्या अनेक खातेधारकांना लाखो रुपये मिळाले.
कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?
तांत्रिक बिघाडामुळे खात्यात हस्तांतरित झालेले पैसे काढल्यास, तसेच ते परत न केल्यास, भारतात बँक ग्राहकांवर कारवाई केली जाऊ शकते का?
मुंबई उच्च न्यायालय अॅड. आनंद पांडे सांगतात, तांत्रिक बिघाडामुळे बँक खात्यात हस्तांतरित झालेली रक्कम जाणूनबुजून काढून वापरल्यास ग्राहकांना भारतीय दंड संहितेच्या कलम 403 नुसार फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते ज्यात अधिकतम दोन वर्षांपर्यंत कारावास शिक्षेचे प्रावधान देखील आहे. तसेच, जर ग्राहकाने (अनावधानाने किंवा कोणत्याही गुन्हेगारी हेतूशिवाय देखील) चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केलेली रक्कम स्वतःच्या वापरासाठी किंवा फायद्यासाठी खर्च केली तर बँक ग्राहकाविरुद्ध चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केलेले पैसे परत मिळविण्याकरिता भारतीय करार कायदा 1872 च्या कलम 72 अंतर्गत सूट फॉर रिकव्हरीचा खटला दाखल करू शकते.
एखाद्या ग्राहकाला त्याच्या बँक खात्यात अपेक्षित नसताना अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाल्यास काय करावे? प्रथम खात्यात आलेले पैसे कोणाकडून येणे अपेक्षित होते का, कोणत्या त्रैमासिक ठेवी किंवा फिक्स्ड डिपॉझीटचे व्याज इत्यादी तर आले नाहीना याची शहानिशा करावी. जर कोठूनही पैसे येणे अपेक्षित नसेल तर खात्यात जमा झालेली रक्कम दुसर्या कोणाची असण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत निधी प्राप्त करणार्या व्यक्तीने ताबडतोब बँकेच्या फोन बँकिंग टीमशी संपर्क साधावा आणि जमा झालेल्या रकमेचा तपशील द्यावा. हे करताना वेळ, बोलणार्या फोन बँकिंग एक्झिक्युटिव्हचे नाव आणि त्या संभाषणाचा संदर्भ (रेफ्रन्स) क्रमांक ही माहिती टिपून घ्यावी. जर बँक फोन बँकिंग सेवा प्रदान करत नसेल (विशेषत: लहान सहकारी बँका इत्यादी) तर ग्राहकाने स्वतः बँकेच्या शाखेत भेट देऊन सर्व माहिती रीतसर स्वाक्षरी केलेल्या पत्राच्या रूपात जमा करावी. पत्राच्या फोटो कॉपीवर बँकेचा शिक्का मारून पोच पावती घ्यावी. बँक अधिकारी खात्याच्या कोणत्याही पैलूत हस्तक्षेप न करता फक्त खात्यात चुकून जमा झालेली रक्कम गोठवतात. या शिवाय, ग्राहक ही रक्कम स्वतःच्या खात्यातून काढून सस्पेन्स खात्यांमध्ये किंवा एस्क्रो खात्यांमध्ये हस्तांतरित करण्याची विनंती देखील बँकेला करू शकतात, असे आनंद पांडे यांनी सांगितले.
जर ग्राहकाला बँकेकडून काही रक्कम एखाद्या त्रुटीमुळे खात्यात जमा झाली असून ती दुसर्या खात्यात जमा करण्याची विनंती करण्याबाबत फोन आला तर कॉलरचे नाव, विवादित रक्कम, ट्रान्जेक्शन आयडी (क्रमांक) आणि कॉल करणार्या कर्मचार्याची शाखा, अशी महत्त्वाची माहिती टिपून घेणे आवश्यक आहे. फोनवर बोलताना कोणताही पडताळणी पिन नंबर, ओटीपी, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती शेअर करू नये. पण फोन करणारी व्यक्ती खरोखरच बँकेची कर्मचारी आहे की नाही याची शहानिशा कशी करावी? बोलणे पूर्ण झाल्यावर ग्राहकाने त्याच्या चेकबुकवर छापलेल्या फोन बँकिंग कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा आणि आधीच्या कॉलरने सांगितलेल्या तथ्यांची बँकेतील दुसर्या कर्मचार्यांशी बोलून उलट तपासणी करावी. खाते छोट्या किंवा सहकारी संस्थेत असल्यास फोन बँकिंगची सेवा उपलब्ध नसते. अशा वेळेस ग्राहकाने थेट बँकेच्या शाखेत जाऊन तथ्यांची खात्री करून घेणे योग्य ठरते, असा सल्ला पांडे देतात.
सायबर घोटाळेबाजांचा ट्रॅप
बँक खातेधारकांना कॉल करून खात्यातून गैरव्यवहार झाले आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक गुन्हा केल्याने अटकेचे वॉरंट निघाले आहे असे सांगून धमकावणार्या घोटाळेबाजांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार पीडितांना व्हिडिओ कॉल देखील करतात आणि कुशलतेने कॉलवर बँक खात्याबाबत तपशील सामायिक करण्यास भाग पाडून फसवतात. लोकांनी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. खरे तपास अधिकारी कधीही फोनवर बँक तपशील, पासवर्ड विचारत नाहीत किंवा अॅप डाउनलोड करायला सांगत नाहीत. तपासणी सुरू असल्यास त्याबाबत वॉरंट जारी करून अधिकारी कार्यालयात भेटायला बोलावितात. फोन किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची तपासणी होत नाही.