जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची ग्वाही
बारामती – अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ही बाब जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही शनिवारी (दि. 2) प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मान्य केली. जिरायत व बागायत भागात नेहमी जितकी मदत दिली जाते त्याच्या तिप्पट मदत यंदा केली जाणार आहे, तीही लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच येत्या तीन दिवसांत जिल्ह्यातील नुकसानीचे सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (दि. 2) पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करण्यात येवून मदतीबाबत आश्वस्त केले आणि त्याप्रमाणे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे समाधान करावे, असे संबंधित शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश दिले.
पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली प्रत्यक्ष पाहणी
दरम्यान, बारामती तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी राम यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे झाल्यानंतर शासनाला अहवाल पाठवून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत नुकसानभरपाई मिळायला हवी, या दृष्टीने नियोजन सुरु केले आहे.
यंदा पुणे जिल्ह्यात 200 टक्क्यांपेक्षाही अधिक पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रताही मोठी आहे. द्राक्षासह फळबागा संपूर्णपणे हातातून गेल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने जो अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे, त्यात प्रत्येक पिकाच्या नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. पंचनामे शक्य तितक्या लवकर करुन घेण्याच्या सूचना त्यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत.
बारामती तालुक्यात 821 हेक्टर क्षेत्र बाधित –
बारामती तालुक्यातील 78 गावांत सुमारे 3600 शेतकऱ्यांचे एकूण 821 हेक्टर शेती क्षेत्राचे व पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित पीक क्षेत्र पुढीलप्रमाणे (हेक्टरमध्ये); भाजीपाला 120, चारा पिके 115, मका 87, ऊस 298, भाजीपाला 120, बाजरी 41, सोयाबीन 280, द्राक्ष 337, कांदा 282 हेक्टर, ज्वारी 261.
वाहून गेलेल्या बंधाऱ्याची केली पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथील वाहून गेलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली तसेच सुपे येथील पावसामुळे कांदा व बाजरीच्या पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच दंडवाडी येथे सोयाबीन व कांदा तर बागायती भागातील पिंपळी व काटेवाडी येथील द्राक्ष पिकाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्यानंतर ते इंदापूरचे दिशेने मार्गस्थ झाले.