कोरेगाव – कोरेगाव-सातारारोड रस्त्यावर कोरेगावपासून दोन किलोमीटरवर असलेल्या भाकरवाडी गावासाठी महत्त्वाचा असलेला वसना नदीवरील पूल सतत पाण्याखाली रहात असल्याने खराब झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत होते. हे लक्षात घेऊन नवीन पुलासाठी आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. नवीन पुलासाठी सरकारने नाबार्डमधून साडेतीन कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे. वसना नदीवर नवा उंच पूल बांधण्यात येणार असून, नजीकच्या काळात गावातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहेत.
भाकरवाडीतील शेतकऱ्यांची शेती वसना नदीच्या पलीकडे आहे. नदीवरील जुन्या पुलाची उंची कमी असून, पुरामुळे हा पूल खराब झाला होता. नदीच्या पलीकडे मोठ्या संख्येने घरे झाली असून, हा परिसर वसनानगर म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात वसनानगरला जाण्यासाठी ग्रामस्थांना कोरेगावातून जळगाव आणि तेथून भाकरवाडी असा प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात रुग्णांना उपचारांसाठी कोरेगाव येथे नेताना अडचण होत होती.
भाकरवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुलाची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. नाबार्डमधून या पुलासाठी निधी, कोरेगाव-सातारारोड रस्त्यापासून भाकरवाडीपर्यंतचा रस्ता आणि गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, बंदिस्त गटारे करण्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले होते.
त्यानुसार बहुतांश रस्ते व गटारे झाली आहेत. मात्र, पुलासाठी मोठ्या निधीची आवश्कता होती. आमदार शिंदे यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वसना नदीवरील पुलाचे सर्वेक्षण करून, नव्या पुलाचा प्रस्ताव सरकारला सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुलासाठी नाबार्डमधून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले.
भाकरवाडी परिसराला येणार महत्त्व
आमदार महेश शिंदे यांनी कोरेगावलगतच्या पाच किलोमीटरमधील भाकरवाडी, जळगाव, बोबडेवाडी, चांदवडी, ल्हासुर्णे, तडवळे संमत कोरेगाव व बाग वस्ती या गावांपर्यंत दर्जेदार रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. ल्हासुर्णे-कुमठे रस्ता भाकरवाडीच्या हद्दीवरुन जात असून, वसना नदीवरील नवा पूल झाल्यावर भाकरवाडीतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना ल्हासुर्णे, जांब बुद्रुक येथे जाणे सुलक्ष होणार आहे. रस्त्यांमुळे भाकरवाडीचा विकास होणार असून, परिसराला महत्त्व येणार आहे.
=========================