पुणे – प्रकल्पांना मंजुरी देऊनही काही विकसकांनी काम सुरू केलेले नाही. अथवा अर्धवट ठेवले आहे, अशा प्रकल्पांची माहिती घेण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 22 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रकल्प सुरू न केल्यास प्रकल्प ताब्यात घेण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून ठप्प पडलेल्या प्रकल्पांबाबत प्राधिकरणाने धोरण निश्चित केले आहे. अशा प्रकल्पांच्या विकासकांना नोटीस देऊन काम थांबवल्यामागची कारणे आणि प्रकल्प कधी मार्गी लावणार, ही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार या नोटीस देण्यात आल्या आहेत. अनेकदा विकासकांकडून पुनर्वसन प्रकल्पासाठीचे प्रस्ताव सादर केले जातात.
परंतु, कार्यवाही केली जात नाही. तसेच प्रकल्प मंजूर होऊनदेखील काम सुरू केले जात नाही, अथवा अर्धवट ठेवले जातात. त्याचा त्रास झोपडीधारकांबरोबरच प्राधिकरणाला देखील सहन करावा लागतो. असे प्रकल्प वेळेत मार्गी लावावेत, यासाठी विकसकांना एक संधी देण्यात येणार आहे. त्यानंतरही विकसकांकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर प्राधिकरण असे प्रकल्प ताब्यात घेणार आहे. त्यानंतर निविदा मागवून ते प्रकल्प अन्य विकसकांना देणार आहे. अथवा प्राधिकरण स्वत: तो प्रकल्प विकसित करणार आहे.