मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच उमेदवारी दिली. याचे मुख्य कारण म्हणजे या मतदारसंघात राणेंच्या हक्काची ३१ टक्के व्होटबँक असल्याचे दिसते.
२०१९ मध्ये राणेंचे पुत्र नीलेश हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे या मतदारसंघात लढले. तेव्हा नवखा पक्ष असतानाही त्यांना ३१ टक्के (२,७९,७०० मते मिळाली होती. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना ५०.७६ टक्के (४,५८,०२२ लाख) मते मिळाली होती. तेव्हा भाजप- शिवसेना युती असल्यामुळे राऊत यांच्या मतांमध्ये भाजपचाही वाटा होता. त्यामुळेच आता राणेंची वैयक्तिक ३१ टक्के मते व त्यात भाजपची ताकद जोडल्यास राणे िवजयी होऊ शकतात, असे भाजपला वाटते. दरम्यान येथून किरण सामंतांनी ऐनवेळी माघार घेतली आहे.
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या कोकणात उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे. तसेच या मतदारसंघात दोन ते अडीच लाख मुस्लिम मतदार आहेत. हे दोन्ही फॅक्टर राणेंसाठी अडचणीचे ठरू शकतात. तसेच मतदारसंघातील एक मोठा वर्ग राणेंच्या दोन्ही मुलांवर नाराज आहे. यात भाजपच्या काही जुन्या मतदारांचाही समावेश आहे. त्यामुळे ही मते राणेंकडे येतील का, असाही प्रश्न आहेच.