पुणे – निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही. तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आठवले यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरपीआय आठवले गटाचे सचिव संघटक परशुराम वाडेकर, सचिव बाळासाहेब जानराव, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, मंदार जोशी, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, की विरोधकांकडून संविधान बदलाची उलटसुलट चर्चा केली जात आहे. लोकशाही धोक्यात आली आहे, असा प्रचार सुरू आहे. लोकशाही जर धोक्यात आली असती, तर पंतप्रधान मोदी मत मागण्यासाठी देशभर फिरले असते का? संविधानावर देश चालणार आहे. विरोधकांनी कितीही बाता मारल्या, तरी संविधानाप्रमाणेच देशाला चालवावे लागेल. देश म्हटला की संविधानाची भूमिका, गीता, कुराण बायबल असे अनेक धर्मांचे ग्रंथ आहेत. याचा आदर सर्वांना आहे. संविधानाने आपापल्या धर्माप्रमाणे चालण्याची परवानगी दिली आहे. देश म्हटला की, संविधान आणि या देशात त्यालाच राहण्याचा अधिकार आहे, ज्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मान्य आहे.
एनडीए ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल –
देशभरामध्ये एनडीएचे वातावरण आहे. त्यामुळे एनडीएच्या चारशेपेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. राज्य आणि देशभरातील मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची भुमिका मांडली जात आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, की आमच्या महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी या वेळी व्यक्त केला.