नगर -ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणारांची प्रवृत्ती शोधली पाहिजे. त्यांना मारणारे हात वेगळे असतील व त्यांच्यामागे काही अदृश्य हातही असू शकतात. त्यामुळे मारणारांचे बोलवते धनी कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी निर्भय बनो अभियानाचे प्रमुख विश्वंभर चौधरी यांनी बुधवारी येथे केली. दरम्यान, हेरंब कुलकर्णी यांना अजूनही पोलिस संरक्षण दिले नसल्याचे ते म्हणाले.
हेरंब कुलकर्णी यांच्यासह सहशिक्षक सुनील कुलकर्णी यांना मागील शनिवारी सावेडीत लोखंडी रॉडने मारहाण झाली. पोलिसांनी या प्रकरणी चौघांसह एका अल्पवयीन मुलाला पकडले आहे. कुलकर्णींना झालेल्या मारहाणीचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, चौधरी यांनी बुधवारी हेरंब कुलकर्णींची घरी भेट घेतली व त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी प्रतिमा कुलकर्णी, अशोक सब्बन, नितेश बनसोडे, ऍड. श्याम असावा, चंद्रकांत पालवे, गणेश भगत, संध्या मेढे, प्रा. मेहबूब सय्यद आदींसह अन्य उपस्थित होते.
कुलकर्णींनी पोलिसांची मदत घेऊन शाळेजवळच्या गुटखा टपऱ्यांची अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे सांगितले जात असले तरी आता दिसते तसेच हे आहे का, हे तपासले पाहिजे. या घटनेमागचे धागेदोरे शोधले पाहिजे. याच कारणाने मारहाण झाली का अन्य काही कारणाने, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. यामागे नेमके कोण आहेत व अन्य काही कारण आहे का? याचा शोध घेताना कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्यास मारहाण होणे हे गंभीर आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे.