सातारा – राज्यातील खोके सरकारच्या काळात शाळा कमी होऊन दारुची दुकाने वाढली, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना लगावला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केल्याशिवाय खोके सरकारचा दिवस सुरु होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गुरुवारी सुप्रिया सुळे जिल्ह्यात आल्या होत्या. येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टीका केली. राज्य सरकारकडून सुरु असलेले खासगीकरण, कंत्राटीकरण चुकीचे असून सुशिक्षित बेरोजगारांना आणखी अडचणीत आणणारे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गोरगरीबांची मुले शिक्षण घेत असून याच शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे.
या खोके सरकारच्या काळात शाळा कमी होऊन दारूची दुकाने वाढली आहेत, असा सणसणीत टोला खा. सुप्रिया सुळे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना लगावला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “”हे सरकार सुडबुध्दीने आणि आकसापोटी काम करत आहे. राज्यातील जनतेला सरकार काय आहे हे चांगले समजले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जोरदार तयारी करण्यात येत असून आ. शशिकांत शिंदे यांना पक्षाकडून आणखी ताकद दिली जाईल.” सत्तेच्या स्वार्थापोटी जे सुरु आहे ते चुकीचे आहे. सध्या राज्यापुढे अनेक आव्हाने असून हे सरकार इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीमध्ये व्यस्त आहे. हे खोके सरकार असून राष्ट्रवादीवर बोलल्याशिवाय खोके सरकारचा दिवस सुरू होत नाही आणि मावळत पण नाही, असेत्यांनीस्पष्ट केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.