सातारा – ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत रेंगाळलेल्या पावसामुळे यंदा थंडीचाही कालावधी जास्त असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र यंदा सलग एक, दीड महिनादेखील कडाक्याची अशी थंडी सातारकरांनाच काय, पण राज्याला अनुभवता आली नाही. कडाक्याची थंडी असणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके सहन करण्याची वेळ आली.
गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढत असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बाजारपेठेतही उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची रेलचेल आहे. थंड पाण्यासाठी वापरले जाणारे माठ, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, उन्हामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी ज्युस सेंटर, रसवंतीगृहांवर होत असलेली गर्दी यामुळे “आला उन्हाळा…’ असेच म्हणावे लागेल.
दिवसेंदिवस वाढलेली उन्हाची तीव्रता ही उन्हाळ्याचीच चाहूल असल्याने सध्या बाजारपेठेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभार, तसेच राजस्थानी कारागिरांनी गरिबांचा फ्रीज म्हणून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी ठेवले आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले हे माठ ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
सकाळी 11 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे अन्न कमी आणि पाणी जास्त अशी अवस्था होत आहे. पाण्यानेच पोट भरत असले तरी भूक शांत करण्यासाठी खाद्य पदार्थांऐवजी आता कलिंगडे खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व्यापारी वर्गानेही ग्राहकांसाठी आकर्षक पद्धतीने मांडणी करुन खरेदीसाठी ठेवलेली कलिंगडे.
दिवसभर उन्हाचा चांगला तडाखा बसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी डोक्याचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या टोप्या व्यापारी वर्गाने विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शरीराची लाहीलाही होत असून घशालाही कोरड पडत असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्ग उन्हामुळे कोरडा झालेला घसा शांत करण्यासाठी ज्युस सेंटरवर गर्दी करत आहेत.
दिवसेंदिवस वाढलेली उन्हाची तीव्रता ही उन्हाळ्याचीच चाहूल असल्याने सध्या बाजारपेठेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभार, तसेच राजस्थानी कारागिरांनी गरिबांचा फ्रीज म्हणून लौकिक असणारे माठ विक्रीसाठी ठेवले आहेत. वेगवेगळ्या आकारांमध्ये तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये असलेले हे माठ ग्राहकांना आकर्षित करत आहेत.