केडगाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे जे वाटेल ते सर्व करू असे सुतोवाच केले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी सकारात्मक पाऊल पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याबाबत शनिवारी (दि. 29) फेब्रुवारी रोजी दैनिक प्रभातमध्ये आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत धनगर मेंढपाळ समाजाची सद्यस्थिती दाखवणारे वृत्त प्रकाशित झाले होते. आणि नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणे याचे साधर्म्य जोडले जात आहे.
अनेक वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे. यासाठी मोठी आंदोलने झाली परंतु प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी नुकतेच धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शब्द दिल्याने धनगर समाजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.