Sanjay Raut : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)खासदार संजय राऊत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या चौकशीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून केंद्रातील मोदी सरकार इंडिया आघाडीतील नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून सरकारवर टीका केली आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी,”भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकार ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ईडी केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना त्रास देत आहे. इंडिया ब्लॉकचे इतर पक्ष पूर्णपणे केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यासोबत आहेत. त्यामुळे केंद्राच्या हे प्रयत्न विफल ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. त्यासोबतच संजय राऊत यांनी भाजप सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, महानंदची गुजरात लॉबीला विक्री केली जात आहे. महानंदच्या जमिनीत मोठा घोटाळा होत आहे.असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावर आपले मत व्यक्त केले आहे. भाजपकडून राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळाले तर त्यांनी त्याठिकाणी जावे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, “लवकरच इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार असून त्यात संयोजक आणि अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला तरी दिली जाऊ शकते. उद्धव ठाकरे यांनी नितीश, केजरीवाल आणि वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली आहे.