नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या एक वर्षापासून युध्द सुरू आहे. हे लवकरच संपुष्टात येईल, असे वाटत असताना गेल्या काही दिवसांत रशियाने पुन्हा युक्रेनवरचे हल्ले तेज केले आहेत. युक्रेनच्या कीव येथेही क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे.
दरम्यान, याच सुमारास भारताकडून युध्दात युक्रेनला मदत केली जात असल्याच्या बातम्या काही माध्यमांकडून प्रसारित केल्या गेल्या आहेत. भारताने त्यांना तोफगोळे दिल्याचा थेट दावाही काही विदेशी माध्यमांतून करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबाबत आपली प्रतिक्रिया आता दिली आहे.
गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की भारताने युक्रेनला कधीही कोणते तोफगोळे पाठवले नाहीत. भारताने कधी याची निर्यातही केलेली नाही. भारतासंदर्भात अशा बातम्या येत असल्याची आम्हाला कल्पना आहे, मात्र आम्ही असे काहीही युक्रेनला दिले नसल्याचे व भारत आपल्या जुन्या भूमिकेवर कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
रशिया- युक्रेन युध्दात भारताने आतापर्यंत तटस्थ अशीच भूमिका घेतली आहे. जेंव्हा युध्द सुरू झाले तेंव्हापासून पश्चिमेकडचे देश युक्रेनच्या बाजूने उभे राहील्याचे दिसले आणि त्यांचा भारतावरही तसा दबाव येत होता. मात्र भारताने रशियासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीला प्राधान्य दिले. चर्चेतूनच तोडगा काढला जावा अशी कोणालाही नाराज न करणारी भूमिका भारताने मांडली.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली असून कुटनीतीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे त्यांना आवाहन केले. युध्द जेंव्हा सुरू झाले तेंव्हा ७२ तासांत आम्ही हे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू असा दावा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी केला होता. मात्र त्यांचा अंदाज चुकीचा ठरला कारण वर्ष झाले तरी अद्याप युध्दाचा निकाल लागलेला नाही.
युक्रेनने रशियाला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना इतर देशांकडून मदतही मिळाली आणि पैसेही मिळाले त्यामुळे त्यांना रशियाविरूध्द भक्कमपणे उभे राहता आले. मात्र तूर्त अशी स्थिती आहे की युक्रेनला अधिक शस्त्रांची गरज आहे मात्र ती मिळण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. त्यामुळे युक्रेन काहीसा बॅकफूटवर गेला असल्याचे भासते आहे.