नवी दिल्ली – भूकंपाचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकार नेपाळला १ हजार कोटी नेपाळी रूपयांची मदत करणार आहे. दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ही घोषणा केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये १२८ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.
परराष्ट्र मंत्र्यांनी आज नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठाचे उदघाटन केले. यावेळी ते म्हणाले, भूकंपाचा तडाखा बसलेल्या नेपाळमधील जिल्ह्यांत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १ हजार कोटी नेपाळी रूपयांचे मदत पॅकेज देण्यासंदर्भात काल मी नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. अलिकडच्या काळात दोन्ही देशांनी वास्तविक स्वरूपाचा बदल अनुभवला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत दोन्ही देशांनी प्रगती केली आहे. परस्पर भागिदारीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा क्षेत्रांतही आम्ही भरपूर विकास केला आहे. माझ्या यावेळच्या नेपाळ दौऱ्या उर्जा क्षेत्रासोबतच अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या बातमीनुसार जयशंकर यांनी नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एन. पी. सौद यांची भेट घेतली. त्यात भूकंपग्रस्तांच्या मदतीचा पहिला हप्ता भारताकडून देण्यात आला आहे.
मदत सामग्री म्हणून भारताकडून २०० घर, १२०० ब्लँकेट, १५० तंबू, २००० स्लिपिंग बॅग, देण्यात आले. २०० घरांपैकी २० घरे तात्काळ सूपूर्द करण्यात आली आहेत. बाकी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या काळात दिली जाणार आहेत. दरम्यान, जयशंकर यांनी सुप्रसिध्द पशुपतीनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेतले आणि भारतीय दूतावासाच्या प्रांगणात वृक्षारोपणही केले.