मुंबई : राज्यात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असून अजित पवारांना मात देण्याकरता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी दौरे करायला सुरुवात केली आहे. शरद पवारांनी पक्षाची सूत्रे अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या हाती दिल्याने अनेक नाराज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी एक फोटो रिट्वीट केला. त्यात त्यांनी त्यांच्या अनुभवाचे बोल अवघ्या एका वाक्यात कथन केले आहे.
शरद पवारांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. परंतु, कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी याला कठोर विरोध केला. जनमत लक्षात घेऊन शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर त्याच महिन्यात पक्षाच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाची सूत्रे दिली. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. दरम्यान, अजित पवार लवकरच भाजपात जाणार असल्याच्याही चर्चा होत्या. परंतु, अजित पवारांनी भाजपात न जाता पक्षातच बंडखोरी केली आणि शिवसेनेप्रमाणे काही आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सत्तेत विराजमान झाले.
दरम्यान, अजित पवारांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे रुपाली चाकणकर यांच्याकडे दिली आहेत. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी आता एक फोटो रिट्वीट केला आहे. यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेताना दिसत आहेत. तिथेच सुप्रिया सुळेही उपस्थित असून त्यांचा चेहरा क्रोधपूर्ण दिसत आहे.
काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात.
# अनुभवाचे बोल https://t.co/0ZKWicW4jQ— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 9, 2023
युवराज या एका ट्विटरच्या वापरकर्त्याने हा फोटो ट्वीट केला असून, “या फोटोत एका नेत्याचा विनम्र भाव दिसतो पण फोटो झुम केल्यास एका नेत्याची प्रचंड असुरक्षितता देखील पाहायला मिळते. नवे नेतृत्व घडले पाहिजे यासाठी आयुष्यभर झगडणारे साहेब कुठे आणि या कुठे”, असे कॅप्शन दिले आहे.
रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्वीटनुसार, सुप्रिया सुळे महिला नेतृत्वाला पुढे येण्यास देत नव्हत्या का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. रुपाली चाकणकर यांनाही असाच त्रास सहन करावा लागला का असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.