भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू गेल्या काही स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरत आहे. हे अपयश तिच्यासारख्या खेळाडूच्या जागतिक वर्चस्वाला मारक ठरत आहे. रिओ व टोकियो ऑलिम्पिकच्या पूर्वी किंवा आता सिंधू ज्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे, त्यात तिला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. तिच्यावर “बिगमॅच चोकर’ असा शिक्का बसला आहे. हाच शिक्का यंदाच्या मोसमात मिटवून टाकण्यात ती यशस्वी ठरेल का, हाच खरा प्रश्न आहे.
सिंधूबद्दल बोलण्यापूर्वी फुलराणी सायना नेहवालचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. सायनाने जेव्हा बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवले तेव्हा तिच्यासमोर कोरिया, चीन, जपान, मलेशिया, इंडोनेशिया या बॅडमिंटनमधील सुपरपॉवरचे आव्हान होते. तिने ते मोडून काढले व ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालताना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. या सातत्यपूर्ण यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव तर होतच होता मात्र, तिला जागतिक स्तरावरची “शटलक्विन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
पुढे तिच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आणि आता तर तिच्यामागे दुखापतींचा ससेमिराही लागला आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद तिला मिळवता आलेले नाही. मात्र, सायनाकडूनच प्रेरणा घेत सिंधूने आपली वाटचाल सुरू केली व सायनाच्याही काही पावले पुढे जाण्याची धमक व पात्रता तिने दाखवली. सध्या सायनापेक्षा सिंधूची लोकप्रियता जास्त वाढलेली दिसत आहे ते तिच्या सातत्यापूर्ण यशामुळेच.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सिंधूचे वर्चस्व जगाने मान्य केले. त्याचीच पुनरावृत्ती तिने टोकियोतही केली. मात्र, या खेळाडूमध्ये सायनाचाच एक गुण किंवा दुर्गुण म्हणा आलेला दिसू लागला आहे. ते म्हणजे ज्या स्पर्धा तिने लीलया जिंकल्या पाहिजेत त्याच स्पर्धांमध्ये ती अपयशी ठरत आहे.
हे म्हणजे असे झाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा विराट कोहली झिम्बाब्वेविरुद्ध शून्यावर बाद झाला तर. वर नमूद केलेल्या देशांची जागतिक बॅडमिंटनवरील मक्तेदारी आधी सायनाने तर, नंतर सिंधूने मोडून काढली. मात्र, ऑलिम्पिकचा अपवाद सोडला तर सिंधू म्हणावे तसे सातत्यपूर्ण यश मिळवताना दिसत नाही हीदेखील वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
तसे पाहिले तर ज्या वयात मुलींना आपली आवड काय आहे ते देखील ठरवता येत नाही त्या वयात सिंधूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पाऊल ठेवले. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पण केले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वयाच्या आठव्या वर्षी मेहबूब अली यांच्याकडे तिने या खेळाचे धडे गिरवायला सुरुवात केली. मात्र, त्यासाठी तिला थोडाथोडका नव्हे तर तब्बल 56 किलोमीटरचा प्रवास करायला लागायचा.
जेव्हा ती स्थानिक स्तरापासून देशांतर्गत स्पर्धांच्या माध्यमांतून राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ लागली तेव्हा भारताचे “ऑल इंग्लंड’ विजेते खेळाडू व प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी तिला आपल्या अकादमीत येण्यास प्रवृत्त केले. सिंधूने या अकादमीत प्रवेश केला आणि त्याचवेळी देशाला सायनापेक्षा जास्त गुणवान खेळाडू गवसली याचा साक्षात्कार झाला.
सिंधूने आजवरच्या वाटचालीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक स्पर्धांचा मेळ लावला तर 16 पदके मिळवली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 5 रजत तर, 8 ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे. सिंधूने आजवर देशांतर्गत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल व दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची रास ओतली आहे. त्यातही तिने दोन वेळा ऑलिम्पिकचे पदकही जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती भारताची एकमेव बॅडमिंटनपटू ठरली आहे.
“ऑल इंग्लंड’चे अपयश सलते
ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये विश्वकरंडक, टेनिसमध्ये ग्रॅंडस्लॅम स्पर्धा अत्यंत मानाच्या समजल्या जातात तसेच बॅडमिंटनमध्ये “ऑल इंग्लंड स्पर्धा’ ऑलिम्पिकच्याच तोडीची समजली जाते. जे खेळाडू बॅडमिंटन खेळतात ते हीच स्पर्धा जिंकणे हे सर्वात महत्त्वाचे स्वप्न बाळगतात. सायना काय किंवा सिंधू काय या दोघींनीही या स्पर्धेत सातत्याने सहभाग घेतला मात्र, एकदाही त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रकाश पदुकोन आणि पुलेला गोपीचंद यांनी हे विजेतेपद मिळवले. आता येत्या काळात सायनाच्या कारकिर्दीवर जरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी सिंधूला आणखी किमान दोन वर्षे संधी आहे. ती येत्या काळात पुढील ऑलिम्पिकसह ही स्पर्धाही जिंकते का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुखापतींचा अडथळा
सायनाला ज्या प्रकारे सध्या सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत आहे ते सिंधूच्या बाबतीत घडू नये अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यासाठी ती सातत्याने आपल्या तंदुरुस्तीवर लक्षही देत आहे. तिच्याकडे जी गुणवत्ता आहे त्याची दखल घेत केंद्र सरकारने तसेच राज्य सरकार व विविध संस्थांनी तिच्यावर पुरस्कारांचा वर्षावही केला आहे. खरेतर पुरस्कार मिळाल्यावर जबाबदारी वाढते असे म्हटले जाते. याच तत्त्वानुसार सिंधू आगामी काळात ऑलिम्पिक पदकाची हॅट्ट्रिक साकार करते का तसेच ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकते का, हे लक्षवेधी ठरणार आहे.
सायनाची कारकीर्द संपण्याची चिन्हे
एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी राहिलेल्या सायनासमोर आता दुखापतींतून सावरण्याचेच आव्हान निर्माण झाले आहे. याच दुखापतीमुळे तिने आता सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतली आहे. आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ती या स्पर्धेला मुकणार आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक मिळवून देणाऱ्या सायनाने यापूर्वी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एक रजत आणि एक ब्रॉंझ पदक पटकावले आहे.
स्नायूंच्या दुखापतीसह ती गुडघ्याला झालेल्या दुखापतीचा सामना करत आहे. ऑक्टोबरमध्ये डेन्मार्कमधील थॉमस कप आणि उबेर कप स्पर्धेतून सायनाला माघार घ्यावी लागली होती. याशिवाय फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या गेममध्ये तिला दुखापतीमुळे सामना सोडावाही लागला होता. गेल्या दोन वर्षांपासून सायना दुखापतींचा सामना करत आहे. ती टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीलाही मुकली होती. दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागत असल्यामुळे तिच्या क्रमवारीतील स्थानावरही परिणाम झाला.
राजकारण कशासाठी?
सायना व सिंधू या सुरुवातीला खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यांच्यातील संवादही अत्यंत अनुकूल असे. ज्या वेळी मोठ्या स्पर्धेत सहभागी होत होत्या त्यावेळी त्या सातत्याने चर्चाही करत होत्या. त्यावेळी या दोघीही गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षक घेत होत्या. त्यानंतर सायनाचे गोपीचंद यांच्याशी काही वाद झाले व तिने त्यांची अकादमी सोडून विमल कुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू केले. त्यानंतर या दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, या दोघींनी हे सर्व दावे फेटाळले असले तरीही विविध स्पर्धांसाठी सहभागी होताना त्यांच्यात आता पूर्वीसारखा संवाद होत नाही हे कोणीही नाकारणार नाही. गटातटाचे गोंधळ राजकारणात होताना आपण पाहतो. मात्र, या वाळवीपासून क्रीडाक्षेत्र तरी दूर राहावे, असे वाटते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सराव हवा
सायना आणि सिंधू देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा सरावही सातत्याने सुरू असतो. मात्र, आता त्यातही काळानुरूप बदल झाला पाहिजे. परदेशात ज्या अत्याधुनिक सुविधा खेळाडूंना पुरवल्या जातात त्याच सर्व गोष्टी या खेळाडूंनाही मिळायला हव्यात. तसेच त्यांच्यासाठी आहारतज्ज्ञ असतातच. मात्र, त्यांच्या जोडीला एक क्रीडा मानसशास्त्रज्ञदेखील हवा.
ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापूर्वी हे सर्व घडले पाहिजे. सिंधू तर सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असते मग सायनालाही दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरल्यावर कोणताही भेदभाव न होता सहभागी होत आले पाहिजे. खेळाडू गोपीचंद, विमल कुमार किंवा पदुकोन यांच्या अकादमीचा आहे का नाही, हे पाहिले जाऊ नये तर तो भारताचा खेळाडू आहे हे पाहिले जावे, हीच काय ती अपेक्षा आहे.
रजतकन्येचा शिक्का नकोसा
सिंधूने आजवर ज्या स्पर्धा जिंकल्या आहेत त्यात सर्वाधिक वेळा तिने रजतपदकच प्राप्त केले आहे. तिच्या नावावर सुवर्णपदके फारशी जमा झालेली नाहीत. कदाचित यामुळेच तिला “रजतकन्या’ असे संबोधले जाते. मात्र, हा उल्लेख तिच्यासाठी नकोसा आहे. येत्या काळात तिने ज्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेल त्यात सुवर्णयश मिळवले व त्यातही सातत्य राखले तरच तिच्यावरचा हा शिक्का पुसला जाईल. पी. टी. उषाप्रमाणे येत्या काळात सिंधूची ओळखही सुवर्णकन्या अशीच व्हावी, हीच क्रीडा रसिकांची अपेक्षा आहे.
अमित डोंगरे