“… सावंत, फक्त एक वर्ष गावडेवाडीत काढा. मी तुम्हाला शब्द देतो; वर एक दिवस तुम्हाला तिथं थांबून नाही ठेवणार. आणि तसंही धरणाचं काम पूर्ण होत आलंय. वाडीत तुमची राहायची चोख व्यवस्था करून ठेवलीय. चोवीस तास शंकर तुमच्या सेवेत हजर असेल.’ तब्बल अर्धा-एक तासाने मोहनच्या बॉसने फोन ठेवून दिला. मोहनपुढे गावडेवाडीत राहायला जाण्यावाचून कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. “कल्याणी, बॅगा भरायला घे. दोन दिवसांत आपल्याला निघावं लागेल. मी उद्याच केदारच्या शाळेत जाऊन दाखला काढून आणतो.’
आणि मोहन त्याच्या कुटुंबाला घेऊन गावडेवाडीकडे निघाला. शेकडो किलोमीटरचा प्रवास करत मोहन गावडेवाडीत पोहोचला. “… हॅलो शंकर, मी सावंत बोलतोय. गावात पोचलोय आम्ही. कुठं आहेस तू?’ “साहेब, हितंच हाय.’ म्हणून शंकरने मध्येच फोन ठेवून दिला आणि दुसऱ्याच मिनिटाला गाडीच्या काचेवर “टकटक’ आवाज आला. मोहनने काच खाली घेतली. हातात कंदील घेऊन शंकर उभा होता. त्याने आदबीने हात जोडले. “साहेब, म्या शंकर.’ “तुला कसं कळलं मी इथं आहे?’ तसा शंकर, “तुमि येणार ते ठाव व्हतं. अन तसं बी, मोट्या अधिकाऱ्याशिवाय गावात गाडी घिऊन कोण येणार? या माज्या मागणं.’
शंकरने सायकलला कंदील अडकवला आणि खड्ड्याखुड्ड्यातून वाट काढत मोहन त्याच्या मागे निघाला. “साह्येब, आजपासनं ह्यो वाडा तुमचा.’ असं म्हणत शंकरने मोहनच्या हातात चावी दिली. मोहन वाड्याला निरखून पाहत होता. “छान आहे. उद्या मला शाळा दाखव. मुलाचं ऍडमिशन घ्यावं लागेल.’ “जी. दावतो. माझं पोरगं बी त्याच साळत शिकतंय.’ “हो का? कितवीला आहे?’ “सातवीला.’ “अरे वा! म्हणजे केदारच्याच वर्गात. चला, केदारला एक मित्र मिळाला…!’ मोहनने केदारच्या डोक्यावरून हात फिरवला. शंकरने केविलवाण्या चेहऱ्याने विचारलं. “साह्येब, तुमचं पोरगं करंल माज्या पोराशी दोस्ती?’ “असं का विचारतोस?’ “जी, काही न्हाई. असंच इचारलं.’ म्हणत शंकर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी शाळेत, “गुरुजी, ह्ये सावंत साह्येब. ह्यांच्या पोराचं नाव घालायचंय.’ गुरुजींनी केदारचा ऍडमिशन फॉर्म भरला. “… चला, आज एक महत्त्वाचं काम पार पडलं. शंकर, तुझा मुलगा कुठंय?’ “असल वर्गात. बगतु.’ काहीवेळाने शंकर वर्गातून बाहेर आला. “त्यो अजून आला न्हाई. इलच घटकाभरानं.’ “बरं. आपण वाट बघू.’ तेवढ्यात शंकर, “त्यो बगा, आलाच.’ असं म्हणत फाटकाच्या दिशेने गेला. डोळ्यावर काळा चश्मा आणि हातातल्या काठीनं चाचपडत एक मुलगा फाटकातून आत येत होता. शंकरने त्याच्या हाताला धरलं आणि मोहनपुढे येऊन उभा राहिला.
“शंतनू. माजं पोरगं.’ बाजूला उभा असलेल्या केदारने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि दोन पावलं पुढे जात शंतनूचा हात आपल्या हातात घेतला. “मी केदार. माझ्याशी मैत्री करणार?’ पहिल्यांदाच स्वतःहून कुणीतरी आपल्याशी मैत्री करतानाचा आनंद शंतनूच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. शंतनूने चाचपडत केदारच्या हातावर आपला हात ठेवला. “हो करील.’ दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. वर्गात जाताना शंतनूच्या हातातली काठी दुमडून घेत, केदारने त्याचा हात घट्ट धरला होता. काल शंकरला पडलेल्या प्रश्नाचं कारण मोहनला आज समजत होतं. त्याने मोहनच्या खांद्यावर हात ठेवला. “चला, आपण आपल्या कामाला लागू.’
वर्गात केदार आणि शंतनू एकाच बाकड्यावर बसले होते. आपल्या बाजूला कुणीतरी बसलंय; या विचाराने जणू शंतनूची छाती फुगली होती. शंतनूला आपल्या हातांच्या बोटांनी उठावदार ठिपक्यांना स्पर्श करून पुस्तक वाचताना पाहून, “याला ब्रेल लिपी म्हणतात ना?’ “हो.’ “मला शिकवशील?’ शंतनू हसून, “तुला काय गरज?’ “असंच…’ “बरं. शिकवीन. धुमाळ बाई आल्या वाटतं.’ एक साथ नमस्ते… म्हणत सर्वजण उभे राहिले. “तुला कसं कळलं?’ “चालताना पायांच्या होणाऱ्या आवाजावरून.’ पहिल्याच भेटीत दोघांची छान गट्टी जमली होती. “मी उद्यापासून सायकल आणीत जाईल.’ शाळा सुटली. केदारने शंतनूला त्याच्या घराजवळ सोडलं आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी केदार शंतनूला सायकलवर घेऊन शाळेला निघाला. “शाळा आवडली का?’ “हो. आणि गावसुद्धा!’ “आमची वाडी भारीच हाय! त्ये समोर डोंगरावरलं देऊळ दिसतंय का?’ केदारने सायकलचा वेग कमी केला आणि दूर पाहू लागला. “हो… हो… दिसलं.’ “कशाचं आहे?’ “मारुतीचं. उद्या सुट्टी हाय. जायचं का?’ “हो जाऊ. पण तुला कसं समजलं समोर मंदिर आहे?’ शंतनू हसून, “पाण्याचा खळखळ आवाज कानावर पडला; की समजतं नदी आली आणि नदीच्या डाव्या अंगाला लागून एक मोठ्ठ्या डोंगरावर देऊळ हाय; ह्ये मला दादा लहानापणापासून सांगत आलाय.’
शंतनू त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा. केदारने सायकल थांबवली. त्याने जमिनीवरची एक चपटी ठिकरी उचलली आणि नदीत भिरकावली. “एक, दोन, तीन, चार आणि पाच… ह्ये पाच टप्पे झाले!’ केदार आनंदाने ओरडत होता. “कसले टप्पे?’ शंतनूने विचारलं. “चपटा दगड पाण्यावर भिरकावायचा आणि मग पाण्यावर टप्पे पडतात. तुला करायचंय?’ असं म्हणून केदारने शंतनूच्या हातात दगड दिला. “फेक आता.’ शंतनूने बराच वेळ प्रयत्न केला; पण नाही जमलं. “तुला कळत कसं नाही. पाण्यावर स्पर्श झाला पाहिजे;
त्याच्या आत नाही. थांब मी शिकवतो.’ असं म्हणून केदारने शंतनूच्या हाताला धरलं आणि होतं नव्हतं तेवढं बळ एकवटून ठिकरी पाण्यावर उडवली. “एक… दोन… आणि सहा. शंतनू तू चक्क सहा टप्पे केलेस!’ केदारने शंतनूला मिठी मारली. आयुष्यभरासाठी डोळ्यांसमोर अंधार घेऊन आलेल्या शंतनूला ती ठिकरी आणि तिचं पाण्याला स्पर्शून उसळणं दिसत नव्हतं; पण केदारच्या मैत्रीच्या स्पर्शाने आत उसळलेल्या आनंदाच्या लाटांत त्याचं मन वाहत गेलं होतं!
दोघे शाळेत पोचले. शाळेच्या पटांगणात झाडाखाली मुलांची गर्दी जमली होती. “शंतनू, झाडाखाली बरीच गर्दी झालीय.’ “अब्दुल चाचा आला असंल. शिनेमा दाखवायला.’ “शिनेमा?’ “हम्म… डब्बा शिनेमा.’ “ये चल ना शंतनू. आपण पण बघू.’ शंतनू खोल आवाजात, “मी काय करू येऊन? तू ये बघून.’ केदार शंतनूच्या हाताला धरून त्या गर्दीत गेला. “चाचा, किती रुपये?’ ‘1 रुपया.’ केदारने खिशात हात घातला. त्याच्याकडं फक्त एकच रुपया होता. त्याने तो चाचाच्या हातात दिला. त्याने शंतनूच्या डोळ्यावरचा काळा चश्मा काढला आणि खोक्यावरचा पडदा त्याच्या डोक्यावर टाकला.
चाचाने पितळी वाटी उपडी करत खोक्यावर टकटक वाजवत गाणं म्हणायला सुरुवात केली. “अरे बम्बई देखो, दिल्ली देखो, एक रुपय्या मे, देश की मेरे शान देखो…’ “चाचा, मी म्हणू?’ केदारने चाचाच्या हातातली वाटी वाजवत गाणं म्हणायला सुरुवात केली. एकीकडे वाटीची खणखण करत त्या शिवलेल्या पापण्यांच्या आड दाटलेल्या अंधारात आभासी जग उभं करण्याची केदारची धडपड; तर दुसरीकडे आंधळ्याला शिनेमा बघताना पाहून घोळक्यातून ऐकू येणारी खद्खद! डोळ्यासमोरचा अंधार अधिकच गडद झाला होता. शंतनूने झट्कन तो पडदा बाजूला सारला आणि डोळे पुसत गर्दीतून वाट काढत निघाला.
“शंतनू… शंतनू… काय झालं?’ केदार त्याच्या मागे धावत आला. शंतनूच्या डोळ्यात पाणी होतं. “पोरं हसत होती म्हणून वाईट वाटलं का?’ “नाही. पैसे आणि तुजे कष्ट वाया गेल्याचं!’ शंतनूला काय म्हणायचं ते केदारला कळलं होतं. वरचेवर दोघांची मैत्री घट्ट होत होती. आता रोज नदीच्या पाण्यात ठिकऱ्या उसळत होत्या! सुट्टीच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात कधी मराठीच्या कविता दुमदुमायच्या; तर कधी इतिहासातले महाराजांचे पोवाडे! ऋतूमागून ऋतू सरत गेले आणि या दोघांच्या मैत्रीचा वेल बहरत गेला. केदारच्या डोळ्यांनी जग पाहताना शंतनूचं आयुष्यच बदलून गेलं होतं!
बघताबघता झर्रकन वर्ष निघून गेलं. “बरं शंकर, आम्ही निघतो.’ आपल्या मुलाच्या आयुष्यात आलेला एक जिवलग मित्र दूर जाणार, या विचाराने शंकर कासावीस झाला होता. “बाबा, मी शंतनूला भेटून आलो.’ केदार त्याला भेटायला घरी गेला; पण शंतनू घरी नव्हता. शाळेत, मंदिरात शोधलं तर तिथेही नव्हता. केदार खिन्न होऊन घरी परतला.
वेशीबाहेर वडाखाली पोरांचा घोळका होता. “बाबा, दोन मिनिटं गाडी बाजूला घ्या ना.’ मोहनने गाडी थांबवली. केदार पळतच त्या घोळक्याच्या दिशेने निघाला.
डबा शिणेमावाल्याभोवती गर्दी जमली होती. केदार वेड्यासारखा त्या गर्दीत शंतनूला शोधू लागला. झाडाच्या आड गुडघ्यामध्ये आपलं मुंडकं खुपसून बसलेला शंतनू त्याच्या नजरेस पडला. केदारने चाचाच्या हातात पैसे ठेवले आणि खोक्यावर टकटक आवाज करत हुंदके देत देत गाणं म्हणू लागला. “अरे बम्बई देखो, दिल्ली देखो, एक रुपये मे…’ शंतनूच्या कानावर केदारचा आवाज पडला आणि तो चाचपडत, धडपडत केदारच्या गळ्याला येऊन पडला.
दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. “मला भेटणार नव्हता का? काळजी घे. निघू मी?’ शंतनूने आवंढा गिळून घेतला. “मित्रा, एकदा सोबत शिनेमा बघायचा होता…’ शंतनूच्या शब्दानं केदारचा उर भरून आला होता! कदाचित केदारच्या नजरेनं आयुष्याकडे बघण्याची ताकद जणू शंतनूला मिळाली होती!
– अमोल भालेराव