आभाळ खूप भरून आले होते. विनायकराव बाल्कनीत उभे राहून पावसाची वाट बघत होते. तेवढ्यात खालून विठोबा येताना दिसला. त्याच्याबरोबर एक काळा सावळा मुलगा पण होता.विठोबा आत्ता कशाला आला असेल विनायकरावांच्या मनात आले. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली आणि विठोबा त्या मुलाला घेऊन आत आला.
“ये विठोबा, आज काय काम काढलेस?’ विनायक रावांनी त्याला आत घेतल्यावर विचारले. “साहेब थोडे बोलायचे होते’, विठोबा म्हणाला. विठोबा कॉलनीतील लोकांच्यागाड्या पुसत असे. कधी कोणाच्या घरचे छोटे मोठे काम करत असे. विठोबा सरळ, साधा, कष्टाळू म्हणून सर्वाना ठाऊक होता. “बोल विठोबा!’ “साहेब हा माझा पोरगा. दहावी पास झाला. चांगलं साठ टक्के मार्क मिळालं. शिकायची बी आवड आहे, कॉलजात जाइन म्हणतोय’. “अरे वा! हुशार आहे की म्हणजे.’ आता विनायकराव निरखून त्या मुलाकडे पाहू लागले. काळा सावळा पण चांगला तरतरीत होता मुलगा. त्याच्या डोळ्यात एक आत्मविश्वास दिसत होता. काहीतरी करून दाखवण्याची उमेद होती.
विठोबा पुढे बोलू लागला, “आता कॉलजमदी जायचे म्हणजे पैका पाहिजे. माझी परिस्थिती तर तुमी जाणताच. तुमी काही मदत…’ विठोबा थोडा चाचरत बोलला. विनायकराव विचार करू लागले. विठोबाच्या कुटुंबाला ते पहिल्यापसून ओळखत होते. त्याचा बा वारकरी. आषाढीची एकही वारी तो चुकवत नसे. तो पूर्वी माळीकाम करत असे. झाडांना पाणी घालताना अभंग गात असे. त्याचेच संस्कार विठोबा आणि त्याच्या कुटुंबावर वर झाले होते. विठोबाच्या बायकोचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हापासून हे तिघेच मिळेल त्यात सुखासमाधानाने राहत होते. “बा कसा आहे?’ विनायक रावांनी विचारले. “त्यो गेलाय वारीला.
उद्या आषाढी हाय, ती झाली कि येईल घरला,’ विठोबा म्हणाला. “नाव काय तुझं? काय शिकणार आहेस आता.’ विनायक रावांनी त्या मुलाकडे वळून विचारले. “माझे नाव गणेश. कॉमर्सला जायचे आहे. ग्रॅज्युएट होऊन नोकरी करणार आणि बाबा आणि आजाला आराम देणार,’ विठोबाचा मुलगा म्हणाला. “मध्येच शिक्षण सोडणार नाहीस ना?’ विनायक रावांनी विचारले. “नाही काका… शिकून मला घरची गरिबी दूर करायची आहे.’ गणेश खूप आत्मविश्वासाने बोलत होता. विनायकरावाना गणेशमध्ये एक चमक दिसली. त्यांनी त्याला मदत करायचा निर्णय घेतला. कॉलेजची फी विचारून घेतली आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगितले.
सांगितल्याप्रमाणे गणेश दुसऱ्या दिवशी आला. विनायकरावांनी फी आणि पुस्तकांचे पैसे गणेशच्या हातात ठेवले. गणेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्याने विनायकरावांचे पाय धरले आणि म्हणाला “काका!..आज्जा म्हणाला होता, विठूराया कोणत्याही रुपात येऊन मदत करतो. आज आषाढीला मला विठूराया भेटला.’ विनायकरावांनी त्याला उठवून जवळ घेतले. “अरे असे म्हणू नकोस बाबा… मी काही एवढा थोर नाही. मला शक्य होत म्हणून केली मदत. आता मन लावून अभ्यास कर आणि शिकूनमोठा हो.’ “हो काका! आणि एक ना एक दिवस मी तुमचे पैसे नक्की परत करेन. नाहीतर काही ना काही परतफेड करेन.’ भरल्या डोळ्यांनी गणेश म्हणाला. “अरे त्याची काही घाई नाही, आधी तू शिक्षण पूर्ण कर. आळस करू नकोस. काही लागल सवरल तर सांग मला.’ विनायकरावानी त्याला निरोप दिला.
विनायकरावांच्या मदतीमुळे त्याचे शिक्षण सुरळीत चालू होते. तो ग्रॅज्युएट झाला तेव्हा आनंदाने पेढे घेऊन आला होता. त्यानंतर लगेचच विनायकरावांची बदली झाली आणि त्यांचे कुटुंब दुसऱ्या शहरात निघून गेले. त्यामुळे विठोबाच्या कुटुंबियांशी त्यांचा संपर्क तुटला. विनायकरावांचा मुलगा विजयही आता मेडिकल चे शिक्षण घेत होता. दिवस भराभर जात होते. विजय आता डॉक्टर विजय झाला होता आणि विनायकराव सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतरचा दिनक्रम त्यांनी छान आखून घेतला होता.
असेच एकदा फिरून आल्यावर त्यांना चक्कर आली, घाम फुटला. त्यांनी जोरात हाक मारली “विजय..!’. विजय धावतच आला. त्याने विनायकरावाना नीट आडवे झोपवले. त्यांचे बीपी बघितले तर ते जास्त होते. “काही नाही बीपी थोडे जास्त झाले आहे. मी गोळ्या देतो त्या घ्या आणि थोडा वेळ आराम करा.’ विजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी त्यांना थोडे बरे वाटले पण नेहमीचा उत्साह नव्हता. विजय म्हाणाला “बाबा आपण सगळ्या टेस्ट करून घेऊ.’ रक्त तपासणीमध्ये त्यांना डायबेटीस असल्याचे कळले. त्यामुळे पथ्य पाणी सुरू झाले. पण त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी वाढतच गेल्या. विजय डॉक्टर असल्यामुळे काही गोष्टी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. युरोलॉजीस्टकडे सर्व तपासण्या झाल्या आणि किडनी निकामी असल्याचे निष्पन्न झाले. दुसरी किडनीसुद्धा कधीही निकामी होऊ शकते असे डॉक्टर म्हणाले. विजयची भीती खरी ठरली.
“विजय मला येऊन भेट जरा.’ डॉक्टर पोतनिसांची हाक ऐकून विजय भानावर आला. हॉस्पिटलच्या सोफ्यावर तो कधीपासून हताश बसला होता. डॉक्टरांची हाक ऐकून तो त्यांच्या केबिन मध्ये गेला. “हे बघ विजय मी तुला खोटी आशा लावणार नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. आपल्याला लवकरात लवकर किडनी मिळायला हवी नाहीतर मग काही खर नाही…’ डॉक्टर म्हणाले. “हं..कळतंय मला.’ विजयला काही सुचत नव्हते. “किडनी लवकरात लवकर मिळावी ही प्रार्थना करण्याशिवाय मी काही करू शकत नाही.’ विजय खूप हताश झाला होता. माझ्या बाबांनी कोणाचे काही वाईट केले नाही मग त्यांच्यावर ही वेळ का यावी या विचारानेच तो खूप अस्वस्थ झाला होता. रात्रभर हॉस्पिटलच्या सोफ्यावर तो बसून राहिला.
दुसऱ्या दिवशी तो डॉक्टरांना भेटायला गेला तेव्हा ते त्याची वाटच बघत होते. “विजय आनंदाची बातमी! आपल्याला डोनर मिळालाय. एका ब्रेन डेड पेशंटचा मुलगा वडिलांची किडनी द्यायला तयार झालाय.’ “काय सांगता काय डॉक्टर?’ अचानक झालेल्या या घडामोडींमुळे विजयला सुखद धक्का बसला. मग सर्व फॉर्मालीटीज वेगाने पार पडल्या. सगळ्या चाचण्या करून झाल्या आणि किडनी देता येईल याची खात्री झाली. सर्व गोष्टी जुळून आल्यामुळे विनायकरावांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले.
आज विनायकरावांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. त्यापूर्वी त्यांनी किडनी डोनरच्या मुलाला भेटायची इच्छा व्यक्त केली. नाश्ता करून ते निवांत बसले होते. बाहेर कुठेतरी सुरेल गाणी लागली होती. ती ऐकण्यात ते तल्लीन होऊन गेले होते. तेव्हढ्यात कोणाची तरी चाहूल लागली. दरवाजातून एक व्यक्ती आत आली. विनायकराव त्याच्याकडे बघतच राहिले. “काका ओळखलंत?’ गणेश होता तो. आज एवढ्या वर्षांनी सुद्धा त्यांनी गणेशला लगेच ओळखले. “म्हणजे विठोबा?’ विनायकरावांचा कंठ दाटून आला. “हो! बाबा गेले आता. गेला महिनाभर आजारी होते. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत. तरीपण मला आनंद आहे की ते अंश रूपाने तुमच्यात अजून जिवंत आहेत.’ बोलताना गणेशचे डोळे पाणावले. विनायकरावांनी मायेने त्याला पोटाशी धरले. विनायकरावांचा निरोप घेऊन गणेश बाहेर पडला. बाहेरून ऐकू आलेले आर्त स्वर विनायकरावांच्या हृदयात उमटले. “भेटला… विठ्ठल माझा!..भेटला… विठ्ठल!’
– अस्मिता भिडे