Sachin Pilot | Lok Sabha Election 2024 – राजस्थानातील सर्व २५ जागांसाठी मतदान झाले आहे. तेथील माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह कॉंग्रेसचे सर्वच दिग्गज नेते वेगवेगळ्या राज्यांत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
आता त्यातच दिल्लीच्या छत्तरपूर येथील प्रचारसभेत बोलताना सचिन पायलट यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या संदर्भात एक मोठे विधान करताना भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की आम्ही सगळे वेगवेगळे पक्ष आहोत. जेंव्हा असे पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करतात तेंव्ही ती सोपी गोष्ट नसते. कोणत्याही पक्षाला आपली राजकीय पकड सोडायची नसते. मग ती कॉंग्रेस पार्टी असो किंवा आम आदमी पार्टी.
मात्र आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून इंडिया आघाडीला विजयी करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार जागावाटप केले आहे. मग आम्ही तीन जागा लढलो आणि तुम्ही चार जागा लढले याचा काही फरक पडत नाही.
भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या भाषणात ३०० पार, ४०० पार, ५०० पार म्हणत आहेत. ते सगळेच पार करत आहेत. मग निवडणूक कशासाठी घेत आहात? ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या थेट लढत आहे त्या राज्यांत कॉंग्रेसला अधिक जागा मिळतील.
राजस्थानातही भाजपपेक्षा कॉंग्रेसला जास्त जागांवर विजय मिळेल. हरियाणात १० पैकी ७ किंवा ८ जागांवर कॉंग्रेसचा विजय होईल. त्याचप्रमाणे बिहार आणि महाराष्ट्रात आमचा विजय होईल असे पायलट म्हणाले.