काळे गुरुजी यांचा “दरबार’ नावारूपास येत होता. आज, त्याच दरबारात काळे साईबाबांच्या सतेज, कृपाळू पण तीष्ण दृष्टीसमोर हात जोडून उभे होते. त्यांच्या बंगल्याच्या आवारात, वीस वर्षापूर्वी, त्यांनी हा मोठ्या हॉलच्या आकाराचा, मंदिरासारखा पवित्र, शांत, निर्मळ परिसर उभा केला होता. त्यांत सुंदर, संगमरवरी, शांत अशी श्री साईबाबांची मूर्ती, त्या समोर, लहानशी, धूप धुनी, छोटे टेबल आणि मोठी, जाड, लांब रुंद सतरंजी! बस्स! पण असा श्री साईबाबा दरबार भरे की येणारा भक्त भान विसरत असे, भक्तीत, नामस्मरणात तल्लीन होई. त्यास शांत वाटे, समाधान मिळे, श्री काळे गुरुजी देखील त्या दरबारात साईसेवेत भान विसरत, आपण इतके ज्ञानी पुण्यवान नाही की श्री साईबाबा प्रसन्न होतील पण आपण या देवतेची एक चरण धूळ आहोत, सेवा फक्त जमेल तशी आपलेपणाने करावी. नम्र असावे.
काळे गुरुजी पूर्वी नोकरी होते, मागे प्रपंच आहे पण त्यांची श्री साईबाबांबद्दल अनन्य भाव, भक्ती वाढतच गेली. हळूहळू लोक दर्शनास, प्रवचनास येऊ लागले. एक दरबाराचे रूपच आले.
काळेगुरुजींच्या मुला-मुलींचे विवाह झाले. संसारनौकेने किनारा गाठला. आता, आठवडयातून एकदा ठराविक दिवशी, दिवसभर हे साईमंदिर सर्वांसाठी खुले असायचे, संध्याकाळी श्री साईदरबार भरे. भक्तमंडळी आरती, अष्टक, स्तोत्र, नामस्मरण यात दंग होत. कांही मंडळी प्रापंचिक समस्या विचारत, सल्ला मागत. गुरुजी श्रीसाईंचे स्मरण करून, योग्य असा सल्ला देत, मार्गदर्शन करत, लोकांना दिलासा मिळे, मन हलके होई, आता, निवृत्त झाल्यापासून तर गुरुजींनी श्री साईसेवेला पूर्ण वाहून घेतले होते. लोकांची श्रद्धा वाढत होती,
सकारात्मक विचारांना चालना मिळत होती. या श्री साईदरबारात गुरुजी भक्तांना एक चांगली दिशा देत ते प्रेमाने सांगत, हे पहा, “शेवटी कर्ता करविता तो देवच आहे. आपण प्रयत्न करायचे. आपल्या ओंजळीत फुले पडू देत, नाही तर काटे, आनंदाने स्वीकारायचे, प्रत्येक घटनेस काही कारण असते, पेरावे तसे उगवते. भले करावे, चांगले होईल. राग, लोभ, हाव, वासना यावर ताबा हवा, संन्यस्त वृत्तीने प्रपंच करावा, संतांनी हे तर सांगितलंय.”
असा गोड, आपलेपणाने, माणुसकीने उपदेश करणारे काळे गुरुजी आज स्वत: मात्र बेचैन झाले होते. त्यांना काही सुचत नव्हते. शेकडो माणसांना त्यांनी धीर दिला होता, यश दिले होते पण आज मात्र, स्वतःतेच अगदी हतबल झाले होते. देवाच्या मूर्तीसमोर उभे होते पण आज मिटल्या डोळ्यांतून अनिवारपणे अश्रू वहात होते, असे कधी झाले नव्हते, इतकी अगतिकता कधी वाट्यास आली नव्हती. आपल्या हाती खरेच काही नाही, परमेश्वर अशी परिक्षा कां पहातो? माणसांची इतकी केविलवाणी अवस्था का करतो, गुरुजींचे मन सैरभैर झाले होते. श्री साईबाबांच्या भक्तीत नेहमी पूर्ण चिंब भिजत असलेले गुरुजी पूर्ण हेलावले होते,
वादळातील वृक्षासारखे, कोणता मार्ग, कसला उपाय, कुठली मात्रा या संकटावर द्यावी? यांचे विचारचक्र असाहस्यपणे फक्त गरगरत होते, तसे काळे गुरुजी साधे, सज्जन! हे विश्व, जगरहाट, माणसाने निर्माण केलेला अफाट पसारा, समाजचौकटी, बंधने, केव्हढा हा व्याप, स्वतःच करायचे कायदे आणि आपणच ते कायदे नकळत तोडायचे, झुगारायचे। तसा माणूस स्वतः आखलेल्या नियमांच्या वर्तुळात धावत असतो, जगत असतो, स्वतःही ठिक आणि समाजही! चाललंय ते सर्व छान चाललंय, सुखदुःखाच्या सावलीत तसं सर्वांच बरं चालतं पण या तारेवरच्या कसरतीत एखाद्याचा पाय घसरतो, त्याला आता सावरायचे कसे? चूक ती चूकच, अपराधच पण…
आजचा प्रसंग, घटना, व्यथा ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमिन हादरली, आता, देवाला तरी कसे म्हणायचे यातून सोडव! घोर अपराध, अनिती, घोडचूक केली आहे यांनी! सरळ, निघून जा, म्हणावे कां? पापी लोकांना क्षमा नाही कां? काळे गुरुजींवर, स्वत:समोर हा प्रश्न पडला नव्हता, ते तर फक्त सल्लागार होते पण ज्या व्यक्तीवर ही अडचण आली आहे, त्याचे काय? आभाळं कोसळलंय त्याच्यावर, त्याला आपण पामर कसला आधार देणार, मार्गदर्शन करणार?
उगीचच, नाहकपणे आपण हा साईदरबार, हे भक्तीमंदिर उभारले, आपली शक्ती किती तोकडी, मदतीचा हात कुचकामी ठरतोय, देवाचा आशिर्वाद घेत, लोकांच्या सुखदुःखावर फुंकर घालू पहातोय, पण आज हा आव, ही सद्भावना, भूमिका अवास्तव, निष्फळ ठरतेय कां? माणसं अशी बेताल वागतातं व शरणागत होऊन ईश्वराच्या पायावर पडतात, देवास हे असे कसे गृहित धरतात, तो तरी यांच्या चौकटीतील नितीमत्ता संभाळत, आधार कसा देणार! काळे गुरुजी अक्षरश: दीन झाले होते, एकदम गलीतगात्र, हवालदिल, मूर्तीकडे पहात फक्त अश्रू ढाळत होते, असाहयतेने, याचना करत होते,
“”हे सृष्टिकर्त्या, आता तू या अडलेल्या भक्तांना सुटकेचा मार्ग दाखव, माझे तर धाबे दणाणले आहे! वाटल्यास मी जामीनदार, साक्षीदार, भागीदार होतो! त्यांची पत्नी देखील, प्रथमच चिंतातूर होऊन म्हणाली, “”अहो, तुमचे कशातच लक्ष नाही, असं, काय वागताय, काय झालं? लोकांच्या समस्यांची ओझी कां उचलताय? खचलाय तुम्ही! सांगा ना, मला कुणावर काय प्रसंग आलाय!” तुमचा साईदरबार! खूप भार पडतोय!” काळे गुरुजी, कधी ही असे विषय आपल्या घरात काढत नसतं. त्यांचा तो देव, त्यांची श्रद्धा, भक्तमंडळी, त्यांच्या समस्या, त्याचे निवारण यामध्ये आपला संसार ते कधीच आणित नसत. ते जग वेगळं, हे जग निराळं ! आज प्रथमच ती झळ पत्नीस बसली होती, ते हसून म्हणाले,
“”अग, कुठे काय? मी बघतो ते! आधी पानं वाढ, भूक लागली आहे.” जाता जाता पत्नी म्हणाली, “”तुम्ही विषय टाळताय, नेहमीचेच हे! तब्येत संभाळा, मग लष्कराच्या ‘भाकरी भाजा!’ घरचे झाले थोडे अन् व्याहाने धाडले घोडे ! नसता ताप’ पत्नी स्वयंपाक घरांत गेली पण तिचे असे विचार ऐकून गुरुजींना वाईट वाटले, इतका त्रयस्थपणा? माणसांवर कोणते प्रसंग येतात, सहाय्य करायला नको कां? ब्रेक निकामी झालेले वहान, घाटातील उतारांवरून वाचवायचे कसे? प्रयत्न ही करायला नकोत?
गेल्या कांही महिन्यांपासून सुरु असलेला चित्रपट डोळ्यांसमोरून सरकू लागला. आठवडयाच्या ठराविक दिवशी, आपल्या बंगल्यातील साई मंदिरात म्हणा, दरबार म्हणा, सर्वांना दर्शनासाठी खुला असतो, गेली अनेक वर्षे प्रथा सुरु आहे. अनेकजण मनोभावे दर्शन घेतात, कुणी दक्षिणा ठेवते, प्रसाद घेतात, श्रद्धेने येतात, काही जण आपल्या परिवारातील समस्या सांगतात, उपाय सांगा म्हणतात, लग्नाच्या, नोकरीच्या, आजारपणाच्या अशा अनेक अडचणी असतात. गुरुजी प्रत्येकाशी आपलेपणाने वागत, गोड बोलत, धीर देत, सकारात्मक उर्जा देत, गेलेला तोल सावरु पहात.
– सुरेश पोरे