मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नुकताच मुंबई दौरा पार पडला. त्यांच्या या दौऱ्यात भाजपला पर्याय म्हणून नवीन आघाडी निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भेटी गाठीचा कार्यक्रम त्यांनी केला.
या भेटीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सिल्व्हर ओकवर झालेली बैठक आणि त्यानंतरची पत्रकार परिषद याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीविषयी मात्र तुरळक चर्चा होताना दिसत आहे. या भेटीत नेमकं काय झालं? ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र, या भेटीच्या वेळी घडलेला एक प्रसंग आता त्यांच्यासोबत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कथन केला आहे.
काय आहे सामनाचा आजचा रोकठोक लेख
दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली.
तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ‘‘मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला.’’ असे निमंत्रण त्यांनी दिले.
तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे.
मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल. महाराष्ट्राने प. बंगालच्या विकासासाठी सहकार्य करायला हवे.
श्री. आदित्य ठाकरे यांच्याकडे ममता बॅनर्जी यांनी एक मागणी केली, ‘‘प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे ‘बंगाल भवन’ उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल.’’ ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे.