मुंबई – राज्यात येत्या महिन्याच्या सुरूवातीपासूनच दैनंदिन करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज राज्यात एकूण 4024 रुग्णांची भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे 3028 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
राज्यामध्ये आज दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृत्यूदर 1.86 टक्के इतका झाला आहे. तर राज्यामध्ये आजपर्यंत एकूण 77,52,304 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.89 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यामध्ये सध्या एकूण 19,261 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी मुंबईत 12,341 रुग्ण, तर ठाण्यात 3611 रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनच्या बीए 5 व्हेरिएंटच्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणचे आहेत. हे सर्व रुग्ण 19 ते 36 या वयोगटातील असून सर्वजण महिला आहेत.