नवी दिल्ली – सगळे काही इश्वराच्या मर्जीने सुरू आहे आणि राजकीय संन्यासाच्या बाबतीत आपल्याला विचार करण्याची गरज नाही अशी भूमिका भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी राजनाथ यांनी पहिली निवडणूक जिंकली होती. आणीबाणीच्या काळात ते तुरूंगातही होते. त्यानंतर ते कायमच राजकारणात सक्रिय राहीले. एक वेळ अशी होती की पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये त्यांचे नाव अग्रभागी होते. २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीची स्वबळावर सत्ता आल्यावर त्यांच्याकडे महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
एका कार्यक्रमात त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की राजकीय संन्यासाच्या संदर्भात विचार करत नाही. माझी इश्वरावर श्रध्दा आहे. आयुष्यात जे काही घडले ते माझ्यामुळेच घडले असा विचार मी कधी केला नाही. आणि इश्वराने असा विचार करण्याची बुध्दीही मला देऊ नये असे मी मानतो.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की त्यांच्या पक्षाला बहुमताने विजय प्राप्त होईल. उत्तर प्रदेशच्या संदर्भात बोलायचे झाले तर राज्यात भारतीय जनता पार्टी सर्व ८० जागाही जिंकू शकते. तथापि, अन्य पक्ष एक- दोन जिंकू शकतील ही शक्यताही नाकारता येत नाही. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्व जागा जिंकेल तसे दक्षिणेकडची राज्ये कर्नाटक आणि ओडिशात आमच्या जागा वाढणार आहेत असेही राजनाथ म्हणाले.