येत्या 24 तासांत क्यार चक्रीवादळाचा बसणार फटका
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर क्यार नावाच्या चक्रीवादळात झाले असून ते राज्याच्या किनारपट्टीपासून 190 किलोमीटरवर आहे. परिणामी, येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार, तर राज्याच्या उर्वरित भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, मिऱ्या, जयगड बंदरात इतर राज्यांमधील हजारो नौका आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.
पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आठवडयापासून पाऊस सुरू आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी रत्नागिरीपासून 190 किलोमीटर, तर मुंबईपासून 340 किलोमीटरवर होते. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सोसाटयाचा वारा वाहत आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 24 तासांत कोकण, गोवा, कर्नाटकात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातही पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
कोकणच्या किनारपट्टीपासून जवळ असलेले क्यार चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. ते येत्या पाच दिवसांत ओमानच्या किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे 27 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमी होईल आणि पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, कोकणात घाट रस्त्यावरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील पर्यटनास 27 ऑक्टोबपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. कोकणातील भातशेतीचे गेल्या चार-पाच दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कापणीस योग्य झालेले पीक वाया गेल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.