कराड – परदेशात जाऊन भारताविरोधात वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. राहुल गांधींना त्याबाबतची जाण नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी यांनाही भारतातील प्रश्नांबाबत परदेशात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी भारतात गेल्यावर याबाबतचे वक्तव्य करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, राहुल गांधी यांनी परदेशामध्ये भारताविरोधी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याकडे राजकीय समजूतदारपणा नसल्याचे दिसून येते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, भरत पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, “”मानहानी प्रकरणी राहुल गांधींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा निर्णय मानणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, एखाद्या जातीविरोधात “हेट स्पीच’करणे चुकीचे आहे. त्यांच्याकडे राजकीय समजूतदारपणा नसल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते.” त्यामुळे अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष व मित्रपक्ष लोकसभेला कसे सामोरे जातील,
याबाबत शंका असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक नागरिकांने घटनेचे पालन करायला हवे. त्याचे उल्लंघन केल्यास त्याबाबतचा निर्णय घ्यायला न्यायप्रक्रिया आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपच्या लोकसभा प्रवास योजना उपक्रमाबाबत ते म्हणाले, “”2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक राज्यातील बदललेली समीकरणे आणि ज्याठिकाणी जास्त ताकद लावण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी ताकद लावल्यास वेगळे चित्र दिसून येईल. त्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.
यासाठी 40 केंद्रीय मंत्री सक्रियपणे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत प्रवास करत आहेत. “दिल्लीतला मंत्री गल्लीत’याप्रमाणे मोदींनी लागू केलेल्या योजना प्रत्येक गावपातळीपर्यंत यशस्वीपणे पोहोचल्या आहेत की नाहीत, याबाबतचा आढावाही केंद्रीय मंत्र्यांकडून घेतला जात आहे.” राज्यात 48 लोकसभा मतदारसंघातील 18 मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप- मनसे युतीची शक्यता नाही
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात भाजप व मनसेचे युती होईल का,? या प्रश्नावर भाजप- मनसे एकत्रित येऊन निवडणुका लढवतील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यावेळी ईव्हीएम नव्हते का?
विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे? या प्रश्नावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये काही राज्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता आली आहे. मग त्याठिकाणी ईव्हीएम मशीन वापरण्यात आली नव्हती का? त्यावेळच्या निकालानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह का उपस्थित केले नाही? असे विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिंदुत्वविरोधी भूमिकेने पक्ष संपवला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारण केले. पक्षाची स्थापना केली. परंतु, त्याच हिंदुत्वाला व राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱ्या पक्षांसोबत जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष संपवला, अशी टीकाही विनोद तावडे यांनी यावेळी केली.