मंचर -आंबेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींकडे नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने वीजजोड तोडल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे उत्तम टाव्हरे यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ठरवून दिलेल्या आराखड्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठ्याचे वीज बिल हे जमा झालेल्या पाणीपट्टीमधून भरावे लागते.
या व्यतिरिक्त नळ जोड दुरुस्ती, पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन, गळती खर्च, विद्युत पंप मेंटेनन्स, केबल खर्च आदी खर्च हे पाणीपट्टीमधूनच खर्च करावे लागतात. छोट्या ग्रामपंचायतींकडे जमा होणारी पाणीपट्टी तुटपुंजी असते. सरकारच्या आराखड्यानुसार 15 व्या वित्त आयोगातून हे बिल भरणे शक्य नाही आणि पाणीपट्टीमधून सगळे खर्च भागवून वीजबील भरणे देखील शक्य होत नाही. यामुळे ग्रामपंचायतींची थकबाकी वाढत जाते आहे.
अलीकडे महावितरणच्या वतीने ग्रामपंचायतींचे नळ पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्यामुळे महावितरणच्या वतीने या नळपाणी पुरवठा योजनांचे वीजजोड तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील 80 टक्के ग्रामपंचायतींची या धोरणामुळे कोंडी झाली आहे.
– उत्तमराव टाव्हरे, सरपंच परिषद, आंबेगाव तालुका